३६ गावांमध्ये अहिल्यादेवी होळकर स्मृती सांस्कृतिक सभागृह उभारणार
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरावर ३६ गावांमध्ये सांस्कृतिक सभागृहांचे बांधकाम करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेची पूर्तता करण्यात आली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ राज्यात ३६ गावांमध्ये सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे दिनांक ७ जानेवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यासंबंधीची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१८-१९ चा अर्थसंकल्प विधीमंडळाला सादर करताना केली होती. प्रती सभागृह ६२ लाख ५३ हजार ४०० रूपये या प्रमाणे एकूण रूपये २२ कोटी ५१ लाख २२ हजार ४०० एवढया खर्चास शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील ज्या ३६ गावांमध्ये सदर सांस्कृतिक सभागृहांचे बांधकाम करण्यात येणार आहे त्यात प्रामुख्याने वाशिम जिल्हयातील सेलु बाजार, धुळे जिल्हयातील वेहेरगांव फाटा व कुसुंबा, चंद्रपूर जिल्हयातील जुनासुर्ला व खेडी, अमरावती जिल्हयातील मादन, हिवरा व पुसदा, भंडारा जिल्हयातील चिचाळ, जैतपूर बारव्हा व सिलेगांव, सांगली जिल्हयातील आरेवाडी व वाळवा, बुलढाणा जिल्हयातील देवधाबा, हिंगोली जिल्हयातील कारवाडी, परभणी जिल्हयातील पिंपळगांव बाळापूर, चिंचोली काळे, महातपूरी, झरी, कळगांव, औरंगाबाद जिल्हयातील आसेगांव, उस्मानाबाद जिल्हयातील लोहगड नांद्रा, चोरखडी व यमगरवाडी, वाशिम जिल्हयातील ढोरखेडा, यवतमाळ जिल्हयातील बेलोरा, नांदेड जिल्हयातील माळेगांव, रिसनगांव, शेळगांव (छत्री), वझरगा, लातुर जिल्हयातील खारवाडी, हणमंत जवळगा, मादलापूर, अकोला जिल्हयातील पुनोती बु आणि वर्धा जिल्हयातील नाचणगांव या गावांचा समावेश आहे.