हिवाळी अधिवेशनात १३ विधेयके आणि ११ अध्यादेश सादर करणार
११ ते २२ डिसेंबर पर्यंत अधिवेशन चालणार
मुंबई दि. २८ राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ११ डिसेंबरपासून सुरु होवून २२ डिसेंबरला संपणार आहे.या अधिवेशनात १३ विधेयके आणि अकरा अध्यादेश सादर करण्यात येणार आहे अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिली. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर विधानभवनात ते बोलत होते.
कामकाज सल्लागार समितीने ११ ते २२ डिसेंबरपर्यंतचे कामकाज निश्चित केले आहे. याकाळात १३ नविन विधेयके आणि ११ अध्यादेश विधीमंडळात मांडले जाणार आहेत. त्या शिवाय विधानपरिषदेतील प्रलंबित ५ विधेयके मांडण्यात येणार आहेत. या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी वाढविण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली त्यानुसार २० डिसेंबरला पुनाहा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावर विचार करुन निर्णय घेतला जाणार आहे. या अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर चर्चा झाली नाही तर कालावधी वाढवला जाईल. विरोधात असताना आपणही अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी करत होता याकडे लक्ष वेधले असता बापट म्हणाले, त्यावेळी जनतेचे प्रश्न मांडून आम्ही सभागृहाचे कामकाज करीत होतो. गोंधळ करुन कामकाज बंद पाडत नव्हतो. दुर्दैवाने आता तसे होत नाही. राज्य सरकार सर्व मुद्यांवर चर्चेला तयार आहे. विरोधकांनी कामकाज सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.