दुष्काळाबाबत केंद्र व राज्यसरकार गंभीर नाही- शरद पवार
मुंबई : राज्यात दुष्काळाबाबत केंद्र सरकारची मदत मागत असताना वस्तुस्थिती काय आहे हे केंद्राला सांगायला लागत आहे आणि तेव्हा केंद्रसरकार पथक पाठवत आहे. त्यामुळे केंद्र व राज्यसरकार याबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
नाशिकमधील माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार अपूर्व हिरे या भाजपच्या नेत्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. यावेळी दुष्काळी पथकाच्या दौऱ्याबाबत बोलताना शरद पवार यांनी केंद्र आणि राज्याच्या दुष्काळी प्रश्नाबाबत असलेल्या अनास्थेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
दुष्काळ पाहणीसाठी आलेले पथक रात्रीची पाहणी करत आहे. राज्य सरकार हव्या त्या योजना करताना दिसत नाही असे सांगतानाच आघाडी सरकार होते तेव्हा मी स्वतः दुष्काळी भागाचा दौरा केला होता. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी तातडीने मदत केली होती. मात्र हे सरकार दुष्काळप्रश्नी गंभीर नाही असे दिसत आहे असेही पवार म्हणाले.
कोर्टात जाण्याचा अधिकार सर्वांना आहे. एखादया व्यक्तीला एखादी गोष्ट पटली नाही तर त्यावर भूमिका मांडण्याचा त्याला अधिकार आहे. राज्यसरकारने ज्या आधारावर निर्णय घेतला त्या आधारावर आपले म्हणणे कोर्टात मांडेल. आमचं एकच म्हणणं आहे आतापर्यंत ज्या वर्गाच्या हिताची जपणूक करताना जे काही निर्णय घेतले गेले आहेत त्याला जराही धक्का न लावता तो पूर्णपणे प्रोटेक्ट करुन हा जो काही नवीन वर्ग आहे त्याला १६ टक्के देण्याची अंमलबजावणी सरकारने करावी आणि सामाजिक तणाव निर्माण होईल अशी अडचण कुणीही निर्माण करु नये अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी मांडली. सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष ते स्वत: भाषण ऐकले आहे ते त्यामध्ये म्हणाले आहेत की,५० टक्क्याच्यावर देता येत नाही.आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परीक्षा आहे. पक्षाच्या अध्यक्षांनी घेतलेली भूमिका त्याला विरोध करुन इथे वेगळी भूमिका घेण्याचे धाडस मुख्यमंत्री दाखवतात की नाही याकडे आमचे लक्ष आहे असेही पवार म्हणाले.
मुस्लिम समाजाला आरक्षण हे दिलेच पाहिजे. आज या देशामध्ये शैक्षणिकदृष्टया, सामाजिकदृष्टया, आर्थिकदृष्टया अतिशय मागासलेले हे घटक आहेत. त्याच्यामध्ये मुस्लिमांच्यासंबंधी विचार करावाच लागेल. त्यादृष्टीने पूर्वीच्या सरकारने आरक्षण देण्याच्यादृष्टीने निर्णय घेतला होता. कोर्टामध्ये त्यागोष्टीला मान्यता मिळाली. मात्र आज हे सरकार धर्माच्या आधारे देणार नाही असे बोलत आहेत. धार्मिक आणि या अन्य धार्मिकतेबाबत एक वेगळी भावना भाजपाच्या नेतृत्वाच्या मनात आहे हे राष्ट्रीय ऐक्याला अनुकूल अशी भूमिका नाही आणि हा अन्याय करणारा आहे. त्यामुळे येत्या काळात मुस्लिम, धनगर समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याच पवार यांनी स्पष्ट केले.
काहींनी सांगितले की मी जिल्हा दत्तक घेतो मला गमंत वाटली आमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही.बाहेरच्या दत्तकाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही स्वकष्टाने स्वकर्तुत्वाने चालवणारे लोक आहोत आम्हाला माहित होते की हे दत्तक विधान काही टिकणार नाही.आपल्याला दत्तक बापावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.अशी जोरदार टिका मुख्यमंत्र्यांवर करतानाच आपला खराखुरा जो बाप शेतकरी आहे तोच आपला खरा घटक आहे त्याच्या मदतीने पुढे जावूया असे आवाहन पवार यांनी केले.