Tuesday, May 27, 2025
Home Blog

नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील त्याला समर्थन !

मुंबई नगरी टीम

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर नाराजी दूर झालेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी आणि शाह मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील त्याला समर्थन देण्याची भूमिका जाहीर केली.मात्र हे जाहीर करीत असतानाच त्यांनी अजून मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला नसल्याचे अप्रत्यक्षरित्या नमूद केले.उद्या गुरूवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समवेत एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आमि अजित पवार यांची बैठक होत असून या बैठकीत मुख्यमंत्रीपदकोण होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा जनाधार मिळाला असला तरी चार दिवस उलटून गेले असले तरी मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय न झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते.मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावे अशी इच्छा भाजपाची असली तरी पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती.आज शिंदे यांनी ठाण्यातील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली.मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील त्याला समर्थन देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.हे सांगतानाच त्यांनी महायुतीच्या नेत्याच्या नावाला पाठिंबा असेल असे सांगत त्यांनी अद्यापही मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला नसल्याचे अप्रत्यक्षरित्या नमूद केले.महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असेल यावर चर्चा करण्यासाठी उद्या गुरूवारी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्यासमवेत महायुतीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन संभ्रम निर्माण झालेला असताना एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दुरध्वनी करून चर्चा केली.सरकार बनवताना,निर्णय घेताना माझ्यामुळे अडचण होईल असे मनात आणू नका.तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षं तुम्ही राज्याचा विकास करण्याची,उद्योगधंदे आणण्याची संधी दिली आहे. तुम्ही निर्णय घ्या.तुमचा निर्णय महायुती, एनडीएचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे. तुम्ही निर्णय घेताना एकनाथ शिंदेंची अडचण आहे असे मनात आणू नका असे शिंदे यांनी सांगितले.उद्या गुरूवारी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर भाजपाचा विधिमंडळ नेता ठरविण्यासाठी भाजपाचे निरीक्षक मुंबईत येवून भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेणार आहेत.या बैठकीनंतर राजभवनावर जावून महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाईल. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी होण्यास येणारा आठवडा उजडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जनतेने मविआचा करेक्ट कार्यक्रम केला ! ४४० व्होल्टचा करंटही दिला

मुंबई नगरी टीम

मुंबई । महायुती सरकार उत्तम काम करू शकते हा विश्वास असल्यानेच महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेने मते दिली आहेत.महाविकास आघाडीकडून मतयंत्रावर अविश्वास दाखवून मतदारांचा अपमान केला जात आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.लोकसभेच्या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन केले,त्यातून शिकलो व पुढे गेलो आणि जिंकलो. जनतेने डबल इंजिन सरकारला मते दिली आहेत.जनतेने मविआचा करेक्ट कार्यक्रम केला आहे तसेच ४४० व्होल्टचा करंटही दिला आहे, असाही टोला त्यांनी लगावला.

नांदेडच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला,त्या ठिकाणी मतयंत्रे चांगली होती का ? असा प्रश्नही बावनकुळे यांनी केला.महाराष्ट्रातील मतदारांनी महायुती सरकारच्या योजनांना मत दिले आहे. आमचे सरकार उत्तम काम करू शकते, असा जनतेचा विश्वास आहे, म्हणूनच हा जनादेश मिळाला आहे. लोकसभेत मविआचे खासदार निवडून आले,तेव्हा मतयंत्रे चांगली होती. सध्या महाविकासवाल्यांना झोप लागत नाही. त्यांना जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते शांत होतील. महाविकासच्या लोकांनी तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा आपली मते का कमी झाली याचे चिंतन करावे असेही बावनकुळे म्हणाले.भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते, महायुतीमधील मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांचे नेते मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आहे. यावर तिन्ही पक्षाचे नेते बसून निर्णय घेतील. केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयावर भाजपाचा कार्यकर्ता कधीच नाराज होत नाही. त्यांचा निर्णय अंतिम असतो.पक्षाचे नेते योग्य निर्णय करतात. लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेणार.उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाजपासोबत बेईमानी केली, तेव्हा त्यांना सरकार बनवण्यासाठी दीड महिना लागला होता, असाही टोला बावनकुळे यांनी लगावला.

विधानसभेतील पराभवानंतर काँग्रेसने घेतला मोठा निर्णय !

मुंबई नगरी टीम

मुंबई । विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. संविधानाने सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे पण आपण एकाला दिलेले मत दुसऱ्यालाच जात असल्याची भावना जनतेत आहे. जनतेच्या भावनांचा आदर करत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर सह्यांची मोहिम सुरु करणार आहे. महामहीम राष्ट्रपती,पंतप्रधान,सरन्यायाधीश व निवडणूक आयोग यांच्याकडे हे अर्ज पाठवण्यात येतील, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक पार पडली.या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुजफ्फर हुसेन, कुणाल पाटील, डॉ. नितीन राऊत, अमित देशमुख, अस्लम शेख, अमिन पटेल, नांदेडचे नवनिर्वाचीत खासदार रविंद्र चव्हाण, मा. खा. कुमार केतकर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे यांच्यासह आमदार उपस्थित होते.या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना पटोले म्हणाले की, मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी संविधानदिनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केली आहे. महाराष्ट्रात लवकरच या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरु केली जाणार आहे. जनतेच्या सह्यांचे लाखो अर्ज राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, व निवडणूक आयोगाला पाठवले जाणार आहेत. भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात ऐतिहासीक प्रतिसाद मिळाला होता आता पुन्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी यात्रा काढली जाणार आहे, या यात्रेलाही महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळेल. लोकशाही वाचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्याची लढाई लढलेली आहे, जनभावना तीव्र झाल्यानंतर १५० वर्षांची ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली हा इतिहास आहे. लोकशाही व्यवस्थेत जनताच सर्वोच्च असून जनभावनेचा आवाज काँग्रेस उठवत आहे, असे पटोले म्हणाले.

भारतीय जनता पक्ष युतीला पाशवी बहुमत मिळाले असूनही चार दिवस झाले तरी मुख्यमंत्री निश्चित होत नाही आणि सरकारही स्थापन होत नाही. राज्यात शेतकऱ्यांचा समस्या आहेत, बेरोजगारी, महागाई, कायदा व सुव्यवस्था असे प्रश्न आहेत पण भाजपा युतीला जनतेची चिंता नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय जोपर्यंत मित्र घेत नाही तोपर्यंत सरकार व मुख्यमंत्री होणार नाही. अडीच वर्षात निम्मी मुंबई व महाराष्ट्र मित्राला विकला आहे, यापुढेही महाराष्ट्र विकण्याचे काम हे सरकार करेल, त्यामुळे मित्राचा आदेश येताच मुख्यमंत्री व सरकार बनेल असे पटोले म्हणाले.काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेता, गट नेता व प्रतोद ठरवण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना देण्याचा ठराव एकमताने या बैठकीत करण्यात आल्याची माहितीही पटोले यांनी दिली.उद्या गुरुवारी टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या विधानसभा उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

महायुती सरकारचा शपथविधी केव्हा होणार ? अजितदादांनी तारीखच सांगितली

मुंबई नगरी टीम

मुंबई । काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडताच भाजपासह अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडला.दुसरीकडे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी महायुती सरकारचा शपथविधी केव्हा होणार ? सरकार केव्हा अस्तित्वात येणार ? याची तारीखच सांगितली.

विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाला.या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळूनही महायुतीचे सरकार स्थापन झाले नाही.देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी जोर धरू लागली असतानाच, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्याने गेल्या चार दिवसात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होवू शकला नसल्याने भाजपा आणि राष्ट्रवादीचे नेते चिंतेत होते.त्यातच नाराज असलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली.मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील त्याला समर्थन देणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.शिंदे यांच्या या भूमिकेमुळे भाजपा आणि राष्ट्रवादी नेत्यांना दिलासा मिळाला.दुसरीकडे राज्यात महायुतीचे सरकार केव्हा येणार,नव्या सरकारचा शपथविधी केव्हा होणार याची माहित अजित पवार यांनी दिली.

एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आणि मी उद्या गुरूवारी दिल्लीला जाणार आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बैठक होणार आहे.उद्या २८ तारीख आहे त्यामुळे येत्या ३० किंवा १ डिसेंबरपर्यंत नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम झाला पाहिजे अशी माहिती अजित पवार यांनी दिली.सरकारचा शपथविधी झाल्यावर लगेच नारपूरचे हिवाळी अधिवेशन होईल. या अधिवेशनात पुरवण्या मागण्या मंजूर करून घेणे महत्वाचे आहे.कामाचा ताण वाढणार असला तरी तिन्ही पक्षात अनुभवी नेते असल्याने अडचण येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कसलीही कटुता न येता खेळीमेळीच्या वातावरणात महायुतीचे मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरविले जातील. उद्या होणा-या बैठकीनंतर त्याला अंतिम स्वरुप येईल.दिल्लीतील नेत्यांच्या बैठकीत जो निर्णय होईल त्याला सर्वांचा पाठिंबा असेल असेही पवार यांनी सांगितले.

एचडीआयएलच्या प्रशासकाने सदनिकाधारकांची नावे केली कर्जबुडव्यांच्या यादीत समाविष्ट; राकेश वाधवान यांचा आरोप

मुंबई नगरी टीम

मुंबई | एचडीआयएलच्या पालघर येथील पॅराडाईज सिटी प्रकल्पातील फ्लॅट मालकांचे कथित खोटे दावे स्वीकारून, कंपनी प्रशासक (रिझोल्यूशन प्रोफेशनल) अभय मानुधाने यांनी संबंधित कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्याचा ठराव मंजूर केला. एचडीआईएल कंपनीचे प्रमोटर राकेश वाधवान यांनी या ठरावाला विरोध केला असून, ठरावाविरोधात भारतीय दिवाळखोरी मंडळाकडे तक्रार दाखल केली आहे.

वाधवान यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, पालघर येथील पॅराडाईज सिटी प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाला प्रशासनाकडून ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळाले होते. सेक्टर १ मधील अनेक इमारतींनी स्वत:च्या सोसायट्या स्थापन केल्या असून, अनेक ग्राहकांनी या प्रकल्पातील घरांचा ताबा घेतला आहे. असे असतानाही, ताब्यात घेतलेल्या आणि आपल्या घरात राहत असलेल्या अनेक घर खरेदीदारांची नावे कर्जदारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, प्रशासकाने येथे राहणाऱ्या लोकांच्या खोट्या दाव्यांची योग्य चौकशी न करता ठराव आराखडा मंजूर करून कंपनीचे दायित्व वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक सदनिकाधारक, ज्यांनी वेळेवर ताबा घेतला नाही आणि ज्यांच्याकडून कंपनीने व्याज वसूल करावे, अशा सदनिकाधारकांचाही ठराव प्रशासकाने कर्जबुडव्या यादीत समाविष्ट केला आहे. त्यामुळे कंपनीवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचा वाधवान यांचा आरोप आहे.

राकेश वाधवान यांनी आपला दावा मजबूत करण्यासाठी काही कागदपत्रे सादर केली आहेत. त्यात असे सांगितले आहे की, अनेक खोटे दावे चौकशी न करता मान्य करण्यात आले, ज्यामुळे कंपनीच्या कर्जदारांची संख्या वाढली आहे. वाधवान यांच्या म्हणण्यानुसार, फक्त पालघरच्या पॅराडाईज सिटी प्रकल्पातच नव्हे, तर नाहूर आणि कुर्ला येथील प्रकल्पांमध्येही अशा बनावट दाव्यांना मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे कंपनीच्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

मात्र, तत्पूर्वी रिझोल्यूशन प्रोफेशनल यांनी या आरोपांवर तक्रारदाराला स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी म्हटले की, केवळ नेमप्लेटवर नाव आहे याचा असा अर्थ होत नाही की ग्राहकांना घरे मिळाली आहेत. याशिवाय, रिझोल्यूशन प्लॅन स्वीकारल्यानंतरही छाननी समिती दाव्यांची पुनर्तपासणी करते, आणि कोणत्याही ग्राहकाला पुन्हा घर दिले जाणार नाही, याची खात्री करुन घेते. या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होणार नाही, असे आश्वासनही आरपीकडून देण्यात आले आहे.

मात्र, तक्रारदाराने भारतीय दिवाळखोरी मंडळाकडे मागणी केली आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करून खोटे दावे कर्जदारांच्या यादीतून वगळावेत. तक्रारदाराच्या या मागणीवर विचार करून बोर्ड लवकरच या प्रकरणावर सुनावणी घेऊ शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरून २० टक्के ! फडणवीसांनी मानले पंतप्रधानांचे आभार

मुंबई नगरी टीम

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत.

केंद्र सरकारचे हे निर्णय शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक ठरतील, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार खाद्यतेलाच्या आयातीवर आता वीस टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. पूर्वी खाद्यतेलच्या आयातीवर शुल्क नसल्याने आपल्या देशातील आणि राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत होता. आता मात्र सोयाबीन उत्पादकांना चांगली किंमत मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले केंद्र सरकारने रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलावरील कस्टम शुल्क १२.५० टक्क्या वरून ३२.५० टक्के केल्याने याचा थेट फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे. सोयाबीन खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने याआधीच घेतला आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

यंदाच्या वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्यात आल्याने त्याचा फटका उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. लोकसभा निवडणूकीत त्याचा अप्रत्यक्ष फटका भारतीय जनता पक्षालादेखील बसला होता. ही चूक सुधारून केंद्र सरकारने आज कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरून २० टक्के इतके कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय कांद्याची निर्यात करताना किमान निर्यात (एम ई पी) किंमत हे पूर्णपणे संपवली आहे. यामुळे कांदा उत्पादकांना आता चांगला भाव मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी असलेली किमान निर्यात किंमतदेखील पूर्णपणे मागे घेण्यात आल्यामुळे बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा होईल,असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने हे क्रांतिकारक निर्णय असल्याचे फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंचा पीए रवी म्हात्रे पैसे घेऊन पदं विकतो !… महायुतीच्या नेत्यांचा गंभीर आरोप

मुंबई नगरी टीम

मुंबई । विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे काळे कारनामे बाहेर येत आहेत. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यासह माजी खासदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचे पीए रवी म्हात्रे यांच्यावर गंभीर आरोप केले.म्हात्रे हे पैसे घेऊन पदे विकत असल्याचा आरोप संजय शिरसाट, निरुपम आणि शेलार यांनी केल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.

गेल्या पंधरा वीस वर्षात ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली त्या सर्वांनीच शिवसेनेत खास करून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नजीकच्या लोकांकडून निवडणुकीत पैसे घेऊन तिकीट विकले जात असल्याचे आरोप केलेले आहेत. यात नारायण राणेंपासून तर राज ठाकरे या अनेक नेत्यांचा समावेश आहे. पैसे घेऊन विधानसभेचे किंवा महापालिकेचे तिकीट दिले जाते, असे आरोप करूनच राज ठाकरे देखील बाहेर पडले होते. या सर्व नेत्यांच्या रडारवर खासकरून उद्धव ठाकरे होते.एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेले आणि विरोधकांना अंगावर घेत शिवसेनेचा किल्ला लढवत असलेले संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी अत्यंत गंभीर आरोप केला. त्यांनी थेटच रवी म्हात्रे आणि विनायक राऊत या दोघांचा नामोल्लेख केला. विनायक राऊत हे उद्धव सेनेचे सचिव आहेत तर रवी म्हात्रे हे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आहेत.संजय शिरसाट यांनी आरोप केला की विनायक राऊत यांच्या मदतीने रवी म्हात्रे हे पैसे घेऊन पक्षातील लोकांना पदे विकत आहेत. ‘पैसे आणा आणि पदे घ्या’ ही कार्यपद्धती सध्या उद्धवसेनेत सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम यांनीही शिरसाट यांच्या आरोपांची पुष्टी केली. निरुपम यांनी आरोप केला की, उबाठा पैसे घेऊन काँग्रेस आणि शरद पवारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपचे आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनीही शिवसेनेच्या दाव्याला समर्थन दिले. पैसे दो पैसे लो याच कामासाठी विनायक राऊत आणि रवी म्हात्रे पूर्वीपासून (कु) प्रसिद्ध असल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला.शिरसाट यांच्या या आरोपाला अद्याप तरी उद्धव सेनेकडून कोणीही प्रत्युत्तर दिलेले नाही. याचाच अर्थ उद्धवसेनेत सारे काही आलबेल नाही, हे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत देखील विनायक राऊत यांनी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचे आरोप झाले होते. त्या आरोपांवर देखील उद्धव ठाकरेंकडून कुठलीही चौकशी करण्यात आली नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी देखील पैसे घेतात, असा थेटच आरोप संजय शिरसाट यांनी केला. त्यांनी नामोल्लेख केला नसला तरी त्यांचा इशारा उद्धवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्याकडे असल्याचे म्हटले जाते. अंधारे या पैसे घेऊन पदे देतात, असा आरोप बीडचे उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला होता. त्यावेळीही या आरोपांची चौकशी उद्धव सेनेकडून करण्यात आली नाही, याउलट जाधव यांना पक्षातून निलंबित करण्यात येऊन अंधारे यांचा बचाव करण्यात आला होता.

मुंबईकरांचा प्रवास सुसाट ! मरिन लाईन ते वांद्रे सी लिंक प्रवास केवळ १० मिनिटात

मुंबई नगरी टीम

मुंबई । धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा मुंबईसाठी गेमचेंजर असा प्रकल्प असून यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकारक,जलद, दिलासादायक आणि वेळेची बचत करणारा असून मुंबईच्या पायाभूत सुविधा विकासातील पुढचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या प्रकल्पाच्या लोकार्पणासमयी सांगितले. या प्रकल्पामुळे मरिन लाईन ते वांद्रे सी लिंक हा प्रवास केवळ १० मिनिटात पूर्ण होणार असून यामुळे वेळ, इंधन वाचेल आणि प्रदुषण कमी होऊन मुंबईकरांची कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या लोकार्पणप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होतेमुंबईतील गेमचेंजर प्रकल्पाचे टप्पे पुढे जात असून यानंतर वर्सोवा, भायंदर, विरारपर्यंत हा प्रकल्प सुद्धा पुढे नेत आहोत. भविष्यात मुंबई ते वर्सोवा मधील ३-४ तासाचे अंतर हे केवळ ४० ते ५० मिनिटात पार करण्यात येईल. हा प्रकल्पाचा पूल पाहतांना विदेशात असल्याचे जाणिव होत असल्याची घडणावळ असून यात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हा प्रकल्प बांधताना कोळी बांधवांची देखील काळजी घेण्यात आली आहे आणि त्यांना देखील न्याय दिला आहे. हे प्रकल्प पुढे पालघर पर्यंत जाणार असून वाढवण बंदराला देखील या कोस्टल रोडचा फायदा होणार आहे. मुंबई खड्डेमुक्त करण्याबरोबरच सर्व रस्ते कॉक्रिटचे करण्यात येणार आहे. मुंबई वाहतूक कोंडीमुक्त तसेच प्रदुषण कमी करण्यासाठीही सर्व उपाययोजना केल्या असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर या प्रकल्पासाठी सर्व परवानग्‌या मिळाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकालात या प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने झाले आहे. या प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामेही लवकरच पूर्ण करण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
प्रकल्पाचे ठळक मुद्दे
हा प्रकल्प मरीन ड्राइव्ह ते वांद्रे-वरळी सागरी सेतूपर्यंत बांधण्यात येत आहे. तात्पुरत्या स्वरुपात वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या दक्षिण वाहिनीवरील ८२७ मीटर लांबीच्या पुलावरुन उत्तर वाहिनीवर सुरू होत असलेली वाहतूक सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहील.

महत्त्वाचे टप्पे – ११ मार्च २०२४ रोजी वरळी ते मरीन ड्राईव्ह ९.२९ किमी. दक्षिणवाहिनी मार्गिका. १० जून रोजी मरीन ड्राईव्ह ते लोटस जंक्शन ६.२५ किमी उत्तरवाहिनी मार्गिका. ११ जुलै रोजी हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गाला जोडणारी मार्गिका (तात्पुरत्या स्वरुपात, ३.५ किलोमीटर) सुरू.

पुढील नियोजन : सद्यस्थितीत प्रकल्पाचे ९२ टक्के काम पूर्ण. प्रकल्पातील वांद्रे-वरळी सागरी सेतूला जोडणारा उत्तर वाहिनीवरील मुख्य पूल व वरळी आंतरबदल डिसेंबर 2024 पर्यंत तर हाजीअली आंतरबदल येथील उर्वरित कामे (मार्गिका क्रमांक १, ६ व ७) मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये : बोगदा खनन संयंत्राच्या (TBM) सहाय्याने भारतातील सर्वात मोठा व्यास (१२.१९ मीटर) असलेल्या बोगद्याची निर्मिती.
भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यामध्ये सकार्डो वायूविजन प्रणालीचा वापर.
भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) उभारून पुलाची बांधणी.

एकाच प्रकल्पामध्ये पुनःप्रापण करुन रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्रक्षेत्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती.

भारतात सर्वप्रथम समुद्रकिनारी भरती-ओहोटी क्षेत्राखालून बोगद्याचे खनन व बांधकाम
या प्रकल्पात प्रवाळांच्या वसाहतींचे स्थलांतर ९० टक्के यशस्वी.

प्रवाहकीय अंदाजानुसार भारतात प्रथमच २४०० मेट्रिक टन वजनाची आणि १३६ मीटर लांबीची महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) स्थापन.

तरविंदरसिंह मारवा व भाजपाविरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

मुंबई नगरी टीम

मुंबई । लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. देशविघातक शक्तींनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे बळी घेतले आहेत.आता पुन्हा गांधी संपवण्याची जाहीर धमकी दिली जात आहे व भाजपाचे सरकार मात्र त्यावर काहीही कारवाई करत नाही हे अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह आहे. राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणारा भाजप नेता तरविंदरसिंह मारवा आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात उद्या शुक्रवारी कॅाग्रेस पक्ष राज्यभर तीव्र आंदोलन करून भाजपा सरकारचा धिक्कार करणार आहे.

खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवा व भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी उद्या सकाळी ११ वाजेपासून तीव्र आंदोलन करुन या विकृत्तीविरोधात निषेध नोंदवाला जाणार आहे. भाजपाचा माजी आमदार तरविंदर सिंह मारवाच्या अटकेची मागणीही केली जाणार आहे अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष, संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.

आरक्षण विरोधात वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन

मुंबई नगरी टीम

मुंबई । अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे शुक्रवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव आ. पंकजा मुंडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते ठिकठिकाणी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड झाला असून सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेसची दुटप्पी भूमिका भाजपा कदापि खपवून घेणार नाही. काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ चा नारा पक्षातर्फे ठिकठिकाणी होणा-या आंदोलनातून देण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोला येथे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे मुंबईत या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ठाण्यात, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन जळगावात आंदोलन करणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पुण्यात, चंद्रपुरात वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, छत्रपती संभाजीनगर येथे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, नंदुरबार येथे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत, भाजपा प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. अहिल्यादेवी नगर येथे आ. राम शिंदे, नाशिकमध्ये आ. देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे तर नागपूरमध्ये प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील हे आंदोलनात सहभागी होणार आहेत.

कॉपी करू नका.