मुंबई नगरी टीम
मुंबई । सरकारचे नक्की काय सुरु आहे हेच कळत नाही.आधी हिंदी सक्ती करून पाहिली आता कबुतरांचा विषय काढला आहे.असे सांगून निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.कोणी काय खाव हे ठरवण्याचा अधिकार महापालिकेला कोणी दिला असा सवाल करीत,ही बंदी पाळू नका, असे माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितले आहे.१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करायचा आणि त्या दिवशी खायचे स्वातंत्र्य नाही हा काय प्रकार आहे ? असेही राज ठाकरे म्हणाले.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील गटाध्यक्ष,विभागाध्यक्ष आणि सरचिटणीस यांची बैठकी पार पडली.मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोनच पक्षांची तळागाळात ताकद असल्याचे त्यांनी यावेळी सांगून,मनसे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या कामाला लागण्याचे निर्देश दिले.या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सरकारवर हल्लाबोल केला.महानगरपालिकांनी जन्माष्टमी आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.यावरून त्यांनी सरकावर निशाणा साधला.स्वातंत्र्यदिनी मांसावर बंदी का घातली जात आहे. मटण आणि मासळी विक्रीची दुकाने सुरू ठेवा असे मी मनसैनिकांना सांगितले आहे,असेही ते म्हणाले. स्वातंत्र्यदिनी तुम्ही लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहात. मांसाहरी आणि शाकाहारी असा वाद निर्माण करणे चुकीचे आहे.काय खावे आणि काय खाऊ नये, हे सांगणारे सरकार कोण असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
दादर येथील कबुतरखान्यावरून जो वाद सुरु आहे, त्याबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्यानुसार सर्वानी वागले पाहिजे.न्यायालयाने जर बंदी घातली आहे तर जैन मुनींनी पण त्याचा विचार केला पाहिजे.कबुतरांमुळे काय रोग होऊ शकतात हे अनेक डॉक्टरांनी सांगितले आहे तरीही कबुतरांना खायला घातले जाणार असेल तर पोलिसांनी खायला घालणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.न्यायालयाचा आदेश असताना आंदोलन झाले तेंव्हाच सरकारने कारवाई करायला पाहिजे होती.त्यात मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले होते.यावरून राज ठाकरे यांनी निशाणा साधला आदेश काय आहे हे लोढांना माहित नाही का ? लोढा हे राज्याचे मंत्री आहेत कुठल्या धर्माचे नाहीत हे त्यांनी विसरू नये असेही ते म्हणाले.काल मराठी लोकांनी आंदोलन केली तेंव्हा त्यांची धरपकड झाली,पत्रकारांना मारहाण झाली त्यामुळे सरकारचे नक्की काय सुरु आहे हेच कळत नाही.आधी हिंदी सक्ती करून पाहिली आता कबुतरांचा विषय काढला आहे असल्याने निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे राज ठाकरे म्हणाले.