Thursday, August 14, 2025
Home Blog

मुंबईत फक्त मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचीच ताकद

मुंबई नगरी टीम

मुंबई । सरकारचे नक्की काय सुरु आहे हेच कळत नाही.आधी हिंदी सक्ती करून पाहिली आता कबुतरांचा विषय काढला आहे.असे सांगून निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.कोणी काय खाव हे ठरवण्याचा अधिकार महापालिकेला कोणी दिला असा सवाल करीत,ही बंदी पाळू नका, असे माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितले आहे.१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करायचा आणि त्या दिवशी खायचे स्वातंत्र्य नाही हा काय प्रकार आहे ? असेही राज ठाकरे म्हणाले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील गटाध्यक्ष,विभागाध्यक्ष आणि सरचिटणीस यांची बैठकी पार पडली.मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना  आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोनच पक्षांची तळागाळात ताकद असल्याचे त्यांनी यावेळी सांगून,मनसे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या कामाला लागण्याचे निर्देश दिले.या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सरकारवर हल्लाबोल केला.महानगरपालिकांनी जन्माष्टमी आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.यावरून त्यांनी सरकावर निशाणा साधला.स्वातंत्र्यदिनी मांसावर बंदी का घातली जात आहे. मटण आणि मासळी विक्रीची दुकाने सुरू ठेवा असे मी मनसैनिकांना सांगितले आहे,असेही ते म्हणाले. स्वातंत्र्यदिनी तुम्ही लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहात. मांसाहरी आणि शाकाहारी असा वाद निर्माण करणे चुकीचे आहे.काय खावे आणि काय खाऊ नये, हे सांगणारे सरकार कोण असा सवालही राज ठाकरे यांनी केला.

दादर येथील कबुतरखान्यावरून जो वाद सुरु आहे, त्याबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, त्यानुसार सर्वानी वागले पाहिजे.न्यायालयाने जर बंदी घातली आहे तर जैन मुनींनी पण त्याचा विचार केला पाहिजे.कबुतरांमुळे काय रोग होऊ शकतात हे अनेक डॉक्टरांनी सांगितले आहे तरीही कबुतरांना खायला घातले जाणार असेल तर पोलिसांनी खायला घालणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे.न्यायालयाचा आदेश असताना आंदोलन झाले तेंव्हाच सरकारने कारवाई करायला पाहिजे होती.त्यात मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले होते.यावरून राज ठाकरे यांनी निशाणा साधला आदेश काय आहे हे लोढांना माहित नाही का ? लोढा हे राज्याचे मंत्री आहेत कुठल्या धर्माचे नाहीत हे त्यांनी विसरू नये असेही ते म्हणाले.काल मराठी लोकांनी आंदोलन केली तेंव्हा त्यांची धरपकड झाली,पत्रकारांना मारहाण झाली त्यामुळे सरकारचे नक्की काय सुरु आहे हेच कळत नाही.आधी हिंदी सक्ती करून पाहिली आता कबुतरांचा विषय काढला आहे असल्याने  निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे राज ठाकरे म्हणाले.

अजितदादांनी लाडकी बहीण योजना आणली,त्यामुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या

मुंबई नगरी टीम

मुंबई । लाडकी बहीण योजना फसवी आहे.महिलांचा स्वाभिमान १५०० रुपयात विकत घेण्यात आला असा आरोप विरोधक करत आहेत. पण जी व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन आली आहे तिला लाडकी बहीण योजना काय समजणार आहे असा टोला लगावतानाच अजित पवार यांनी ही योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत केले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक महिला विकास मंडळ सभागृहात राज्यातील प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत आगामी निवडणुकांसंदर्भात पार पडली.सर्व समाज घटकांतील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. हे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार जिथे उभा असेल तिथे अजित पवार यांच्या रुपाने पक्षाची ताकद उभी केली जाईल असे आश्वासन तटकरे यांनी यावेळी दिले. निवडणूक आयोगाकडून नवीन मतदार नोंदणीचे काम सुरूच असते.निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर केली जाते.मतदारांकडून हरकती मागविल्या जातात आणि मतदारनिहाय आकडेवारीही जाहीर केली जाते.संबंधित मतदारयादी त्या -त्या पक्षाला निवडणूक आयोगाकडून पाठवली जात असते.त्यावेळी विरोधकांनी हरकत नोंदवायला हवी असते.मात्र विरोधक सध्या महाराष्ट्राला लक्ष्य करत आहे असा हल्लाबोल तटकरे यांनी केला.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ५० टक्के जागा महिलांसाठी असतील. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त जागा मिळतील यात शंका नाही. येणारी निवडणूक जिंकायची आहे. विधानसभेत जशा जास्त जागा मिळाल्या आहेत. ते पहाता पुढच्या काळात आपली जबाबदारी वाढणार आहे असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले. विधानसभा निवडणुकीत मिळालेली आकडेवारी न पहाता मिळालेल्या संधीचा फायदा करुन घेतला पाहिजे असे आवाहन यावेळी खासदार सुनेत्राताई पवार यांनी यावेळी केले.

घरे पुढच्या पिढ्यांसाठी सोन्यासारखी गुंतवणूक ; त्यामुळे यातील घर विकू नका

मुंबई नगरी टीम

मुंबई  । बहुप्रतीक्षित अशा वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील  पहिल्या टप्प्यातील ५०० चौरस फुटांच्या घरांच्या एकूण ५५६ सदनिकांचे वितरण आज करण्यात आले.ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दुसरा व डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा पूर्ण होणार असून,वरळी येथील सर्व बीडीडी चाळ वासियांना घर मिळणार आहेत अशी माहिती देतानाच धारावीचा देखील अशाच पद्धतीने पुनर्विकास केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिर येथे बीबीडी चाळीतील ५५६ पुनर्वसन सदनिकांचा वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.ही केवळ चाळ नाही.तर हा इतिहास आहे.या चाळीने मागच्या शंभर वर्षांचा इतिहास पाहिलेला आहे.या चाळीच्या भिंतींमध्ये अनेक कहाण्या आहेत. अनेक प्रसंग, आठवणी या चाळीच्या भिंतीनी पाहिलेले आहेत.विविध कारणांसाठी या चाळीतील घरांमध्ये काही वेळा येणे झाले. ही फक्त नावालाच चाळ आहे.मात्र,येथील लोकांचे जगणे हे झोपडपट्टीतील रहिवाशांपेक्षा वाईट असल्याचे येथील भेटीदरम्यान पाहिले आहे.राज्यात महायुतीचे सरकार येताच बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प हाती घेतला. बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा दीर्घकाळाचा अडथळा शासनाने दूर करत सामान्य मुंबईकरांना त्यांच्या हक्काचे घर देण्याच्या दिशेने पाऊले टाकली असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आजवर २० ते २५ वर्षांपासून विविध कारणांनी हा प्रकल्प रखडला होता. शासनाने या  प्रकल्पात विकासक न नेमता, थेट म्हाडा मार्फत हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. जागतिक निविदा काढून काम हाती घेण्यात आले. जागेचा सर्वोत्तम वापर, सौर ऊर्जा, पावसाच्या पाण्याचा निचरा,कचरा व्यवस्थापन अशा आधुनिक सुविधा यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दुसरा व डिसेंबरमध्ये तिसरा टप्पा पूर्ण होणार असून, वरळी येथील सर्व बीडीडी चाळ वासियांना घर मिळणार आहेत,असेही,मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

धारावी पुनर्विकासालाही गती मिळाली असून १० लाखांहून अधिक लोकसंख्येचा हा परिसर एक ‘नवीन शहर’ म्हणून उभारला जाणार आहे. येथील सर्व रहिवाशांना पात्र ठरवत घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धारावीत पाच वर्षांपर्यंत तेथील व्यवसायांवर कर सवलती देण्यात येतील. धारावी ही औद्योगिक वसाहत होऊन तिथेच रोजगार निर्मितीसुद्धा करण्यात येणार आहे.बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे ही केवळ बांधकाम नसून,पुढच्या पिढ्यांसाठी सोन्यासारखी गुंतवणूक आहे. हा ठेवा पुढील पिढीला द्यायचा आहे.त्यामुळे कोणीही यातील घर विकू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांवर अजित पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी

मुंबई नगरी टीम

मुंबई । आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेले आणि मुंबई अध्यक्ष राहिलेले नवाब मलिक यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सोपवली आहे.मुंबई निवडणूक व्यवस्थापन समितीमध्ये नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, आमदार सना मलिक- शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, राजू घुगे यांची तर निमंत्रित म्हणून दक्षिण जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, उत्तर – पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष अजय विचारे, उत्तर – मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अर्शद अमीर, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंग, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव आदींचा समावेश आहे.

अजितदादा अ‍ॅक्शन मोडवर; मुंबई-गोवा महामार्गाबाबत दिले धडक कार्यवाहीचे आदेश

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई – गोवा मार्गावरून दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांची गैरसोयीतून सुटका व्हावी यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णायक बैठक घेत तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश देत कोलाड ते माणगांव दरम्यानच्या सर्व बायपाससाठी २१ कोटी ९० लाख रूपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेतला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली खासदार सुनिल तटकरे यांच्या पुढाकाराने आज मुंबई-गोवा महामार्गावरील गैरसोयी दूर करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली.२७ ऑगस्टपासून कोकणातील गणेशोत्सवाला सुरूवात होत असून लाखोंच्या संख्येने कोकणवासीय आपापल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. या पार्श्‍वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाची डागडुजी करणे व वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची भूमिका खासदार सुनिल तटकरे यांनी यावेळी मांडली. दरम्यान, १० ऑगस्ट रोजी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने पळस्पे फाटा, पनवेल येथे पाटपूजा करून आंदोलन सुरू केल्याची बाब खासदार तटकरे यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिली. यावर, जनआक्रोश समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तटकरे यांच्या भूमिकेचे समर्थन करत अनेक मागण्या केल्या. यावर,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धोरणात्मक निर्णय घेत, ज्या – ज्या ठिकाणी बोगद्यांच्या अपुर्ण कामामुळे वाहतूकीचा खोळंबा होत आहे अशा कोलाड ते माणगांव दरम्यानच्या सर्व बायपाससाठी २१ कोटी ९० लाख रूपयांचा निधी मंजूर करत ही कामे तातडीने पुर्ण करण्याचे निर्देश दिले. यासोबतच सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून ही सर्व कामे पुर्ण होईपर्यंत त्यावर देखरख करण्याची सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. तसेच या महामार्गावर जिथे – जिथे खड्डे असतील त्याबाबत प्रवाशांच्या तक्रारी नोंदवून घेण्यासाठी हेल्पलाईन निर्माण करून तक्रार येताच क्षणी पुढील २४ तासात सकारात्मक कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

सातपुडा सरकारी बंगला अजून का सोडला नाही ! धनंजय मुंडेंनी सांगितले कारण

मुंबई नगरी टीम

मुंबई । धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद गेल्यांतरही त्यांनी अद्याप सातपुडा हा सरकारी बंगला सोडलेला नाही.त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले असतानाच आपण सातपुडा बंगला का सोडला नाही याचे स्पष्टीकरण दिले आहे.मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्या योग्य नसून, त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे.भाड्याने घर मिळणे सध्या कठीण आहे, माझा शोध ही सुरु आहे.माझ्या सदनिकेचे काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार असून, तशी शासनाकडे विनंती केली आहे असल्याचे धनंजय मुंडे यांनी संगितले आहे.

धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद गेल्यांतरही त्यांनी अजून सातपुडा या शासकीय बंगल्याचा ताबा  सोडलेला नाही. यामुळे मुंडे यांना आतापर्यंत 42 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. हा दंड माफ करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी मुंबईतील गिरगाव चौपाटीवर असलेल्या घराचा उल्लेख केलेला आहे. मात्र मुंबईत घर नसल्याने बंगला खाली केला नसल्याचे मुंडे यांनी यापुर्वी सांगितले होते. त्यांनतर त्यांचे गिरगाव येथे प्रशस्थ सदनिका असल्याचे पुढे आल्याने त्यांच्यावर चौफेर टीकास्त्र सुरू होताच मुंडे यांनी या प्रकरणी खुलासा केला आहे.मुंबईतील सातपुडा हे शासकीय निवासस्थान मी रिक्त केले नसल्याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत.मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्या योग्य नसून, त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणे गरजेचे आहे. मात्र या परिसरात तातडीने  भाड्याने घर मिळणे सध्या कठीण आहे, माझा शोध ही सुरु आहे.माझ्या सदनिकेचे काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार असून,तशी शासनाकडे विनंती केली आहे असे मुंडे यांनी सांगितले आहे.

गणेशोत्सव मंडळांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘स्वदेशी’ची जनजागृती करावी

मुंबई नगरी टीम

मुंबई । सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत ‘ ऑपरेशन सिंदूर’ वर आधारित देखावे हे जवानांसाठी समर्पित असण्याची अपेक्षाही व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशोत्सवा दरम्यान गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत, त्यापद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आढावा घेताना बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे मूर्तीकरांनाही सलग पाच वर्ष परवानगी देण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मूर्तीकारांनी या परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरण करावे. परवानगीसाठी महापालिके मार्फत सुरू करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीवर आधारित एक खिडकी योजनेचा लाभ घेण्यात यावा. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची संख्या आणि उंच मूर्तींचे खोल समुद्रात विसर्जनासाठी बोटींची संख्याही समुद्रकिनारी वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राज्य शासनातर्फे हा महोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विस्तृत नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी दिलेल्या सर्व सवलती याही वर्षी कायम ठेवण्यात येतील. हा उत्सव साजरा करताना कायद्याचे योग्य पालन करावे. ईद ए मिलाद सणही गणेशोत्सवा दरम्यान येत असल्याने समन्वयाने धार्मिक सौहार्दता ठेवत कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. गणेशोत्सवादरम्यान ध्वनिक्षेपकांना दिलेल्या परवानगीचे दिवस वाढविण्यासाठी न्यायालयाच्या अधीन राहून सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यालयांसाठी मालमत्ता कराची आकारणी करताना या कार्यालयांचा व्यावसायिक कारणासाठी उपयोग होत नसल्याबाबत मंडळांनी प्रशासनाला लेखी दिल्यास, अशा मंडळांच्या कार्यालयांवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येणार नाही, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

देश स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा भाजपाचे लोक ब्रिटिशांची पेन्शन खात होते

मुंबई नगरी टीम

मुंबई ।  स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे, स्वतंत्र्य दिन व भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा भाजपाचे पूर्वज ब्रिटिशांसोबत होते,काहीजण ब्रिटिशांची पेन्शन खात होते, इंग्रजांना मदत करत होते.भाजपाच्या पूर्वजांवरचे हे काळे डाग लपवण्यासाठीच स्वातंत्र्यदिनी कोणी काय खायचे याचे फतवे काढले जात आहेत, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

एक देश एक नेता संकल्पना आणून एकच नेता,एकच पेहराव, एकच भाषा आणि एकच खानपान करून देशातील विविधतेतील एकता संपवायची आणि हुकूमशाही आणायची हा भाजपाचा डाव आहे. हिंदू-मुस्लीम वाद तर दररोजच सुरु आहे. आधी मराठा ओबीसी वाद घातला त्यानंतर मराठी हिंदी वाद व आता १५ ऑगस्टला मासांहार करु नये यासाठी फतवा काढला आहे, जनतेवर सर्वप्रकारे सरकारी नियंत्रण आणण्याचा हा प्रकार आहे असल्याचे सपकाळ म्हणाले.भाजपा युती सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरु आहे, प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे, राज्य दिवाळखोरीत काढले आहे तसेच मतचोरीच्या वास्तवापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपा सरकारनेच कबुतर खान्याच्या प्रश्नाला हवा दिली आहे.तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात दंगा नियंत्रण पथक स्थापन केले होते पण देवेंद्र फडणवीस यांनी दंगो करो पथक स्थापन केले आहे. हे पथक नागपूर, पुणे, नाशिक, मुंबईमध्ये पाठवून सामाजिक शांतता भंग करत आहे. जैन समाजातील महान संत महावीर यांनी विनय, विवेकता, विनम्रता याची शिकवण दिली आहे, त्याचे पालन होताना दिसत नाही असेही सपकाळ म्हणाले.

मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पॅनलचा दणदणीत विजय !  राष्ट्रवादीचा दारूण पराभव

मुंबई नगरी टीम

परळी । राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे वैद्यनाथ अर्बन बँकेवर वर्चस्व कायम राहिले आहे. मंत्री पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे तेराही उमदेवार मोठया मताधिक्याने निवडून आले आहेत. या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारूण पराभव झाला.

वैद्यनाथ बँक संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल रिंगणात उतरले होते. या पॅनलच्या चार जागा या अगोदरच बिनविरोध निवडून आल्या आहेत, त्यात माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे, अनिल तांदळे,विनोद जगतकर आणि माधुरी मेनकुदळे यांचा समावेश होता.संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी परळीपासून मुंबईपर्यंतच्या ३६ मतदान केंद्रावर शनिवारी मतदान पार पडले. एकूण ४३ हजार ९६२ मतदारसंख्येपैकी १६ हजार २८७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, एकूण मतदानाची टक्केवारी ३७.५ इतकी नोंदवली गेली होती.

हे आहेत विजयी उमेदवार

आज बीड येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. दुपारी सर्व तेरा जागांचे निकाल हाती आले, यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठया मताधिक्याने निवडून आले. विजयी उमेदवार  पुढील प्रमाणे – विनोद सामत, प्रकाश जोशी,राजाराम मुंडे, संदीप लाहोटी, प्रवीण देशपांडे, महेश्वर निर्मळे, विजय वाककेर, अमोल डुबे, कुलभूषण जैन, राजेंद्र लोमटे, सुशांत लोमटे, मनमोहन कलंत्री, रमेश कराड.

रक्षाबंधनाच्या दिवशी एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न

मुंबई नगरी टीम

मुंबई ।  यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या चार  सुट्ट्यांमुळे प्रवाशी वाहतुकीतून एसटीला १३७.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे.

दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी ३०.०६ कोटी रुपये, रक्षाबंधन दिवशी ३४.८६ कोटी व दुसऱ्या दिवशी ३३.३६ कोटी रुपये तर तिस-या दिवशी तब्बल ३९.९ कोटी इतके विक्रमी उत्पन्न एसटीला मिळाले आहे. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने ४ दिवसात १ कोटी ९३ लाख प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल ८८ लाख आहे.

कॉपी करू नका.