Wednesday, August 13, 2025
Home Blog

गणेशोत्सव मंडळांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘स्वदेशी’ची जनजागृती करावी

मुंबई नगरी टीम

मुंबई । सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत ‘ ऑपरेशन सिंदूर’ वर आधारित देखावे हे जवानांसाठी समर्पित असण्याची अपेक्षाही व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशोत्सवा दरम्यान गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत, त्यापद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आढावा घेताना बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे मूर्तीकरांनाही सलग पाच वर्ष परवानगी देण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मूर्तीकारांनी या परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरण करावे. परवानगीसाठी महापालिके मार्फत सुरू करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीवर आधारित एक खिडकी योजनेचा लाभ घेण्यात यावा. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची संख्या आणि उंच मूर्तींचे खोल समुद्रात विसर्जनासाठी बोटींची संख्याही समुद्रकिनारी वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे राज्य शासनातर्फे हा महोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विस्तृत नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी दिलेल्या सर्व सवलती याही वर्षी कायम ठेवण्यात येतील. हा उत्सव साजरा करताना कायद्याचे योग्य पालन करावे. ईद ए मिलाद सणही गणेशोत्सवा दरम्यान येत असल्याने समन्वयाने धार्मिक सौहार्दता ठेवत कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. गणेशोत्सवादरम्यान ध्वनिक्षेपकांना दिलेल्या परवानगीचे दिवस वाढविण्यासाठी न्यायालयाच्या अधीन राहून सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यालयांसाठी मालमत्ता कराची आकारणी करताना या कार्यालयांचा व्यावसायिक कारणासाठी उपयोग होत नसल्याबाबत मंडळांनी प्रशासनाला लेखी दिल्यास, अशा मंडळांच्या कार्यालयांवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येणार नाही, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

देश स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा भाजपाचे लोक ब्रिटिशांची पेन्शन खात होते

मुंबई नगरी टीम

मुंबई ।  स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे, स्वतंत्र्य दिन व भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा भाजपाचे पूर्वज ब्रिटिशांसोबत होते,काहीजण ब्रिटिशांची पेन्शन खात होते, इंग्रजांना मदत करत होते.भाजपाच्या पूर्वजांवरचे हे काळे डाग लपवण्यासाठीच स्वातंत्र्यदिनी कोणी काय खायचे याचे फतवे काढले जात आहेत, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

एक देश एक नेता संकल्पना आणून एकच नेता,एकच पेहराव, एकच भाषा आणि एकच खानपान करून देशातील विविधतेतील एकता संपवायची आणि हुकूमशाही आणायची हा भाजपाचा डाव आहे. हिंदू-मुस्लीम वाद तर दररोजच सुरु आहे. आधी मराठा ओबीसी वाद घातला त्यानंतर मराठी हिंदी वाद व आता १५ ऑगस्टला मासांहार करु नये यासाठी फतवा काढला आहे, जनतेवर सर्वप्रकारे सरकारी नियंत्रण आणण्याचा हा प्रकार आहे असल्याचे सपकाळ म्हणाले.भाजपा युती सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरु आहे, प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे, राज्य दिवाळखोरीत काढले आहे तसेच मतचोरीच्या वास्तवापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपा सरकारनेच कबुतर खान्याच्या प्रश्नाला हवा दिली आहे.तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात दंगा नियंत्रण पथक स्थापन केले होते पण देवेंद्र फडणवीस यांनी दंगो करो पथक स्थापन केले आहे. हे पथक नागपूर, पुणे, नाशिक, मुंबईमध्ये पाठवून सामाजिक शांतता भंग करत आहे. जैन समाजातील महान संत महावीर यांनी विनय, विवेकता, विनम्रता याची शिकवण दिली आहे, त्याचे पालन होताना दिसत नाही असेही सपकाळ म्हणाले.

मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पॅनलचा दणदणीत विजय !  राष्ट्रवादीचा दारूण पराभव

मुंबई नगरी टीम

परळी । राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे वैद्यनाथ अर्बन बँकेवर वर्चस्व कायम राहिले आहे. मंत्री पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व म्हणजे तेराही उमदेवार मोठया मताधिक्याने निवडून आले आहेत. या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दारूण पराभव झाला.

वैद्यनाथ बँक संचालक मंडळाच्या १७ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनल रिंगणात उतरले होते. या पॅनलच्या चार जागा या अगोदरच बिनविरोध निवडून आल्या आहेत, त्यात माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे, अनिल तांदळे,विनोद जगतकर आणि माधुरी मेनकुदळे यांचा समावेश होता.संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी परळीपासून मुंबईपर्यंतच्या ३६ मतदान केंद्रावर शनिवारी मतदान पार पडले. एकूण ४३ हजार ९६२ मतदारसंख्येपैकी १६ हजार २८७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, एकूण मतदानाची टक्केवारी ३७.५ इतकी नोंदवली गेली होती.

हे आहेत विजयी उमेदवार

आज बीड येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. दुपारी सर्व तेरा जागांचे निकाल हाती आले, यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार मोठया मताधिक्याने निवडून आले. विजयी उमेदवार  पुढील प्रमाणे – विनोद सामत, प्रकाश जोशी,राजाराम मुंडे, संदीप लाहोटी, प्रवीण देशपांडे, महेश्वर निर्मळे, विजय वाककेर, अमोल डुबे, कुलभूषण जैन, राजेंद्र लोमटे, सुशांत लोमटे, मनमोहन कलंत्री, रमेश कराड.

रक्षाबंधनाच्या दिवशी एसटीला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न

मुंबई नगरी टीम

मुंबई ।  यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या चार  सुट्ट्यांमुळे प्रवाशी वाहतुकीतून एसटीला १३७.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे.

दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी ३०.०६ कोटी रुपये, रक्षाबंधन दिवशी ३४.८६ कोटी व दुसऱ्या दिवशी ३३.३६ कोटी रुपये तर तिस-या दिवशी तब्बल ३९.९ कोटी इतके विक्रमी उत्पन्न एसटीला मिळाले आहे. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने ४ दिवसात १ कोटी ९३ लाख प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल ८८ लाख आहे.

राज ठाकरे अद्याप महाविकास आघाडीत नाहीत; काँग्रेस नेत्याचे वक्तव्य

मुंबई नगरी टीम

मुंबई । उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचा अद्याप निर्णय झालेला नाही ते दोघेभाऊ एकत्र येत असतील तर त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे.त्यामुळे राज ठाकरे अद्याप मविआत नाहीत. त्या दोन भावांचा निर्णय झाला की चर्चा करून असे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधूमध्ये युतीच्या चर्चा आहेत.याबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत वक्तव्य केले आहे.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात अद्याप युतीचा निर्णय झालेला नाही ते दोघेभाऊ एकत्र येत असतील तर त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्यामुळे राज ठाकरे अद्याप मविआत नाहीत. त्या दोन भावांचा निर्णय झाला की चर्चा याबाबत काँग्रेस निर्णय घेईल असे चेन्नीथला यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्ष देशातील लोकशाही व संविधान संपवण्याचे काम करत आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी केली जात आहे. महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटकातील मतचोरी राहुल गांधी यांनी उघड केली आहे. लोकशाही व संविधान आज धोक्यात असून ते वाचवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत आहेत, ही लढाई मोठी व कठीण आहे. पण आपण सर्वजण राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा लढा जिंकू असे चेन्नीथला म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, नसीम खान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊन, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष पवन खेरा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम संदीप, यु बी. व्यंकटेश, रामकिशन ओझा, पृथ्वीराज साठे, संजय दत्त, रविंद्र दळवी, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना चेन्नीथला म्हणाले की, देश कठीण परिस्थितीतून जात आहे. शेजारी देशांशी आपले चांगले संबंध नाहीत, अमेरिका भारताला धमकी देत आहे पण पंतप्रधान त्यावर काहीच बोलत नाहीत. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अमेरिकाच काय कोणत्याही देशाने भारताला धमकी देण्याचे धाडस केले नाही. राहुल गांधी चीनबद्दल काही बोलले तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यावर टिप्पणी करतात. आता न्यायालय  देशप्रेमी कोण हे ठरवणार का, असा प्रश्न त्यांनी विचारला. महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार सर्वात भ्रष्ट असून कृषी मंत्री विधानसभेत रमी खेळतो, तर गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतात असे चेन्नीथला म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेत चेन्नीथला म्हणाले की, राहुल गांधी यांनी प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले त्यावर आयोगाने उत्तर दिले पाहिजे पण फडणवीस उत्तर का देत आहेत. फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत का निवडणूक आयुक्त ? असे चेन्नीथला म्हणाले.

रेशन दुकानदारांना १५० रुपयांऐवजी १७० रुपये नफा मिळणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या नफ्यामध्ये क्विंटल मागे २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या १५० रुपयांऐवजी १७० रुपये नफा मिळणार आहे.

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना ५३ हजार ९१० रास्तभाव दुकानदारांमार्फत ई-पॉस मशिनद्वारे बायोमेट्रीक पडताळणी करून अन्नधान्य, साखर व इतर वस्तुंचे वितरण करण्यात येते.या दुकानदारांना केंद्र शासनाकडून ४५ रुपये आणि राज्य शासनाकडून १०५ रुपये असे एकूण क्विंटलमागे १५० रुपये नफा म्हणून दिले जात होते.या रकमेत वाढ करण्यात यावी अशी मागणी दुकानदारांच्या संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार क्विंटलमागे २० रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार क्विंटलमागे रास्त भाव दुकानदारांना १७० रुपये  असा नफा देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे ९२ कोटी ७१ लाख रुपयांचा आर्थिक बोजा राज्य सरकारवर पडणार आहे.

राज्यात मेगा भरती ! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यात १५ हजार पोलीस भरती करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस दलात २०२४ दरम्यान रिक्त असलेली व २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहे.या भरतीमध्ये २०२२ व २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्यानुसार २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या भरतीमध्ये २०२२ व २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे.या भरतीमध्ये १० हजार ९०८ पोलीस शिपाई,२३४ पोलीस शिपाई चालक,२५ बॅण्डस् मॅन, २ हजार ३९३ सशस्त्री पोलीस शिपाई,५५४ कारागृह शिपाई व कारागृह शिपाई ही पदे क गट संवर्गातील आहेत.पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हास्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर ( तत्काळ मुल्याकंन होणारी ) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची असल्याने पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो.पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय,सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी,तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली होती.

वाहतूक कोंडीतून सुटका होणार !  दहिसरचा टोल नाका स्थलांतरित करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबईमध्ये प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.यावर उपाय म्हणून दहिसर टोल नाका ठाण्याच्या मार्गावर असलेल्या वेस्टर्न हॉटेलसमोर (फाउंटन) स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.यामुळे लवकरच प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यार आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील अनेक टोल नाके रद्द केले तसेच सर्व टोल नाक्यावरील लहान वाहनांना टोलमाफी केली.दहिसर टोल नाक्यामुळे  मिरा भाईंदर शहरातील १५ लाख स्थानिक नागरिक, वाहनचालक, तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून इंधनाचा विनाकारण अपव्यय  होत आहे. मंत्री सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा टोल नाका शहराच्या आत असल्याने, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा टोल नाका २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर हलवावा. यामुळे मीरा-भाईंदर व मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल.या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील त्याला समर्थन !

मुंबई नगरी टीम

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर नाराजी दूर झालेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी आणि शाह मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील त्याला समर्थन देण्याची भूमिका जाहीर केली.मात्र हे जाहीर करीत असतानाच त्यांनी अजून मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला नसल्याचे अप्रत्यक्षरित्या नमूद केले.उद्या गुरूवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समवेत एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आमि अजित पवार यांची बैठक होत असून या बैठकीत मुख्यमंत्रीपदकोण होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा जनाधार मिळाला असला तरी चार दिवस उलटून गेले असले तरी मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय न झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते.मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावे अशी इच्छा भाजपाची असली तरी पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती.आज शिंदे यांनी ठाण्यातील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली.मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील त्याला समर्थन देणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.हे सांगतानाच त्यांनी महायुतीच्या नेत्याच्या नावाला पाठिंबा असेल असे सांगत त्यांनी अद्यापही मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला नसल्याचे अप्रत्यक्षरित्या नमूद केले.महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण असेल यावर चर्चा करण्यासाठी उद्या गुरूवारी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्यासमवेत महायुतीच्या राज्यातील नेत्यांची महत्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन संभ्रम निर्माण झालेला असताना एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दुरध्वनी करून चर्चा केली.सरकार बनवताना,निर्णय घेताना माझ्यामुळे अडचण होईल असे मनात आणू नका.तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षं तुम्ही राज्याचा विकास करण्याची,उद्योगधंदे आणण्याची संधी दिली आहे. तुम्ही निर्णय घ्या.तुमचा निर्णय महायुती, एनडीएचे प्रमुख म्हणून जसा भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही अंतिम आहे. तुम्ही निर्णय घेताना एकनाथ शिंदेंची अडचण आहे असे मनात आणू नका असे शिंदे यांनी सांगितले.उद्या गुरूवारी दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर भाजपाचा विधिमंडळ नेता ठरविण्यासाठी भाजपाचे निरीक्षक मुंबईत येवून भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेणार आहेत.या बैठकीनंतर राजभवनावर जावून महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाईल. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी होण्यास येणारा आठवडा उजडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जनतेने मविआचा करेक्ट कार्यक्रम केला ! ४४० व्होल्टचा करंटही दिला

मुंबई नगरी टीम

मुंबई । महायुती सरकार उत्तम काम करू शकते हा विश्वास असल्यानेच महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेने मते दिली आहेत.महाविकास आघाडीकडून मतयंत्रावर अविश्वास दाखवून मतदारांचा अपमान केला जात आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.लोकसभेच्या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन केले,त्यातून शिकलो व पुढे गेलो आणि जिंकलो. जनतेने डबल इंजिन सरकारला मते दिली आहेत.जनतेने मविआचा करेक्ट कार्यक्रम केला आहे तसेच ४४० व्होल्टचा करंटही दिला आहे, असाही टोला त्यांनी लगावला.

नांदेडच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला,त्या ठिकाणी मतयंत्रे चांगली होती का ? असा प्रश्नही बावनकुळे यांनी केला.महाराष्ट्रातील मतदारांनी महायुती सरकारच्या योजनांना मत दिले आहे. आमचे सरकार उत्तम काम करू शकते, असा जनतेचा विश्वास आहे, म्हणूनच हा जनादेश मिळाला आहे. लोकसभेत मविआचे खासदार निवडून आले,तेव्हा मतयंत्रे चांगली होती. सध्या महाविकासवाल्यांना झोप लागत नाही. त्यांना जेव्हा झोप लागायला लागेल तेव्हा ते शांत होतील. महाविकासच्या लोकांनी तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा आपली मते का कमी झाली याचे चिंतन करावे असेही बावनकुळे म्हणाले.भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते, महायुतीमधील मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांना त्यांचे नेते मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आहे. यावर तिन्ही पक्षाचे नेते बसून निर्णय घेतील. केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयावर भाजपाचा कार्यकर्ता कधीच नाराज होत नाही. त्यांचा निर्णय अंतिम असतो.पक्षाचे नेते योग्य निर्णय करतात. लवकरच महायुतीचा मुख्यमंत्री शपथ घेणार.उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाजपासोबत बेईमानी केली, तेव्हा त्यांना सरकार बनवण्यासाठी दीड महिना लागला होता, असाही टोला बावनकुळे यांनी लगावला.

कॉपी करू नका.