तपासानंतरच वैभव राऊतचे सनातनशी संबंध आहे की नाही सिद्ध होईल
गृहराज्यमंत्री दीपक केसरकर
मुंबई : नालासोपारा येथे काल रात्री वैभव राऊत याच्या घरावर छापे टाकून एटीएसने आठ देशी बॉम्ब हस्तगत करण्यात आले असून, वैभव राऊत याचा सनातनशी संबंध आहे की नाही हे अजून सिद्ध झाले नाही, तपासानंतर सत्य समोर येईल अशी माहिती गृह राज्यमंत्री(ग्रामीण) दीपक केसरकर यांनी आज दिली.
जोपर्यत या प्रकरणाचा संपूर्ण तपास अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत निष्कर्ष काढणे चुकीचे आहे असे केसरकर म्हणाले. या प्रकरणाचा तपास एटीएसएस मार्फत चालू असून, एटीएसला तपास करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे त्यामुळे ते योग्य तपास करत असल्याचे केसरकर यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास जसा पुढे जाईल तशी अधिकची माहिती समोर येईल.या प्रकरणी आत्तापर्यंत ३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना पोलीस कोठडी देवून तपास करण्यात येईल असेही केसरकर म्हणाले.
ज्यावेळी संशयास्पद लोक सापडतात तेव्हा त्यांचे कुठे कुठे धागेदोरे आहेत का त्याचा तपास केला जातो. तसेच अटक केलेल्या व्यक्तींचा यापूर्वीच्या गुन्ह्यात सहभाग आहे का हे देखील तपासले जाईल. प्राथमिक तपासणीत काही आढळून आलेले नाही. त्यामुळे रासायनिक अहवाल आल्यानंतर याबाबत निकर्ष काढू शकतो असे केसरकर यांनी सांगितले.
सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार संजीव पुनाळेकर यांनी गृहमंत्री जाणून बुजून हे घडवत असून, सनातनच्या कार्यकर्त्यांना वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संस्थेला बदनाम करीत असल्याचे वक्तव्य पुनाळेकर यांनी केले होते. त्यावर, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. त्याचा कोणाशीही संबधीत असू दे. गुन्हेगाराला शासन करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. त्यामुळे पुनाळेकर यांचे वक्तव्य हे अपरिपक्व असल्याची टीका केसरकर यांनी केली.