अमित ठाकरेंच्या पुढाकारामुळे मुख्यमंत्र्यांनी दिला गणेशोत्सव मंडळांना दिलासा
मुंबई : गणेशोत्सव मंडळांना सणासंदर्भात कुठल्याही अडचणी येणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिली आहे.गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
गणेश मंडळांना गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली होती.गणेश मंडळांनी मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असून सुद्धा गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी महापालिकेकडून परवानग्या मिळत नसल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली होती. गणेश मंडळांशी झालेल्या बैठकीनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गिरगावातील गणेश मंडळांना भेट देऊन तुम्ही बिनधास्त मंडप बांधा आणि गणेशोत्सव साजरा करा असा थेट आदेश गणेश मंडळांना दिला होता.
गणेशोत्सव काही दिवसांवर असून, गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनामार्फत मंडप काढा असा गणोशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवर दबाव वाढला होता. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बाजूने उभे राहत या प्रकरणात स्वत: लक्ष घालून अमित ठाकरे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, विभाग अध्यक्ष संतोष धुरी, धनराज नाईक व मुंबईतील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील खूपशी मंडळ ही जुनी असून त्यातील अनेक मंडळांनी रौप्य, सुवर्ण, हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून, ह्या सर्व गोष्टी माहीत असतानानादेखील मंडपाच्या परवानग्यांसदर्भात प्रशासन नाहक गणोशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहे अशी व्यथा अमित ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली. तुम्ही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करा, कायदेशीर अडचणी तुम्हाला येणार नाहीत यासंदर्भात राज्य सरकार काळजी घेईल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित ठाकरे व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी शिष्टमंडळास दिले. तसेच यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना फोनवर गणेशोत्सव मंडळाच्या मंडपासंदर्भात सूचना दिल्या व गणेशोत्सव मंडळांना सणासंदर्भात कुठल्याही अडचणी येणार नाही अशी ग्वाही दिली.यावेळी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिका-यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमित राज ठाकरे यांचे आभार मानले.