ईव्हीएम हटवले तर भाजप सरकार पडेल : राज ठाकरे
मुंबई: आगामी निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेतले तर भाजप सरकार निश्चित गडगडेल, असा टोला लगावत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांचे दोस्त संघटनेच्या ‘ ईव्हीएम हटाव, भाजप भगाव ‘ या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.
मुंबईतील कृष्णकुंज या निवास स्थानी लोकांच्या दोस्तांच्या शिष्टमंडळाने राज ठाकरे यांची भेट घेतली. लोकांचे दोस्तने एक महिन्या पूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाला लेखी निवेदन देऊन आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी केली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष रवि भिलाणे दिली. राज ठाकरे यांना त्या निवेदनाच्या प्रतिही देण्यात आल्या. दोस्तांच्या शिष्टमंडळाशी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, २७ ऑगस्ट ला दिल्लीत जे विविध पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटले, त्या सर्व पक्षप्रमुखांना मी माझ्या पक्षाच्या वतीने, ईव्हीएम नको म्हणून निवेदन दिले आहे. ईव्हीएम विरोधी मोहिमेत आम्ही लोकांच्या दोस्त सोबत आहोत.
त्यानंतर लोकांचे दोस्त शिष्टमंडळाने काॅग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली.यावेळी खा. खरगे यांनी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे मांडलेल्या ईव्हिएम विरोधी भूमिकेची माहिती दिली. तर खा.अशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेसच्या वतीने आम्ही दोस्तांच्या निवेदनाचा निश्चीतच गांभीर्याने विचार करू.
या शिष्टमंडळात रवि भिलाणे यांच्या सोबत समीर अंतुले, प्रशांत राणे, ममता सुरेंद्र अढानगळे, मंगेश साळवी, क्रेग रोझारीओ, प्रमोद कचरू जाधव, सतशील मेश्राम, सुनंदा नेवसे आणि संतोष गवळी यांचा समावेश होता.










