वारे काँग्रेस तेरा खेल” आ. राम कदमांचा अशोक चव्हाणांवर पटलवार

“वारे काँग्रेस तेरा खेल” आ. राम कदमांचा अशोक चव्हाणांवर पटलवार

मुंबई : काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कोल्हापूर येथे जनसंघर्ष यात्रेत भाजपवर केलेल्या टीकेचा समाचार भाजपचे प्रवक्ते आ. राम कदम यांनी “वारे काँग्रेस तेरा खेल” अशा शब्दात घेतला आहे.

देवदर्शनासाठी थाटामाटात काढलेल्या जनसंघर्ष यात्रेत काँग्रेस पक्षाला सरकारवर टीका करण्यासाठी कशाची मदत घ्यावी लागली तर ती २००९ मध्ये त्यांनीच केलेल्या कायद्याची. हा भूजल अधिनियम २००९ मध्ये राज्यात लागू करण्यात आला. २०१३ मध्ये तो राज्याच्या सभागृहाने मंजूर केला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्या आधारावर हा कायदा करण्यात आला, ते मॉडेल बिल २००५ मध्ये तत्कालिन केंद्र सरकारने मंजूर केले आणि राज्यांकडे पाठविले. या तिन्ही वर्षांत केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचेच सरकार होते. या पक्षाने राज्य कारभार कसा केला असेल, याचा हा नमूना आहे. त्यांना काहीही आठवत नाही आणि आता आपल्याच या कायद्याबद्दल २०१८ मध्ये ते भाजपाच्या सरकारवर टीका करीत आहेत. ‘वारे काँग्रेस तेरा खेल’ असे म्हणण्याची पाळी आता आली आहे, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी केली आहे.

‘पाणी अडवा-पाणी जिरवाच्या नावाखाली ‘एकमेकांची अडवा-एकमेकांची जिरवा’ हा कार्यक्रम राबविणार्‍या काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीसाठी काय प्रयत्न केले, राज्यातील किती शेतकर्‍यांच्या कृषीपंपाला वीज दिली, किती सिंचन क्षमता साध्य केली, १४ वर्षांत केवळ ४५० कोटींचे धान्य खरेदी करणारे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला शेतकर्‍यांप्रती कळवळा येतो, याचे आश्चर्यच वाटते. पण, ८२०० कोटींचे धान्य अवघ्या ३ वर्षांत खरेदी करून शेतकर्‍यांप्रतिची वचनबद्धता दाखविणार्‍या सरकारवर टीकेचा आपल्याला अधिकार तरी आहे काय, याचा काँग्रेसने एकदा शांतपणे विचार करावा आणि प्रत्येक टीका करण्यापूर्वी हा कारनामा आपल्या काळातील तर नाही ना, हेही एकदा तपासून पहावे, असा सल्लाही आ. कदम यांनी दिला आहे.

Previous articleहा माझा लढा ; संघर्षाची वज्रमुठ कायम ठेवा : पंकजाताई मुंडे
Next articleजनतेतील प्रचंड असंतोषामुळे मुख्यमंत्री राज्यात फिरू शकत नाहीत