कोट्यवधी पाण्यात..मंत्रालयाच्या पायऱ्या तोडणार !
मुंबई : पाच वर्षापूर्वी मंत्रालय लागलेल्या आगी नंतर नूतनिकरणात मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळील बांधलेल्या पायऱ्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि अग्निशमन दलाला अडथळा ठरत असल्याने आता त्या तोडण्यात येणार आहेत.
राज्यात आघाडी सरकार असताना २०१२ साली लागलेल्या भीषण आगीनंतर मंत्रालयातील मुख्य इमारतीचे बांधकाम करण्यात आले.सुमारे २०० कोटी रुपये खर्च करून मंत्रालयाचे रूपडे पालटण्यात आले.त्याच वेळी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेद्वाराजवळ असलेल्या मोकळ्या जागेत प्रसिद्ध अशा एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांसारख्याच पायऱ्या बनवण्यात आल्या. मात्र गेल्या चार वर्षात याचा कसलाही वापर करण्यात आला नाही. अभ्यागतांना या ठिकाणाहून प्रवेश देण्यात येणार होता.मात्र आता या पायऱ्याच पोलिसांच्या सुरक्षेला धोका आणि अग्निशमन दलालाही अडथळ्याच्या ठरत आहेत. पुरातत्व विभागानेही मंत्रालयाबाहेरील या पायऱ्यांचा काही उपयोगच नसल्याचे म्हटले आहे. आता या पायऱ्या पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हिरवा कंदील दाखवला असल्याने त्या लवकरच पाडण्यात येणार आहेत.