सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजप नेते मस्तवालः खा. अशोक चव्हाण

सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजप नेते मस्तवालः खा. अशोक चव्हाण

इंदापूर : सत्तेची नशा डोक्यात गेल्याने भाजपचे नेते मुलींना पळवून नेण्याची भाषा करित आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनता भाजपच्या मस्तवाल नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे ते पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे विशाल जनसंघर्ष सभेत बोलत होते.

काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा आज सहाव्या दिवशी पुणे जिल्ह्यात पोहोचली. गावोगावी नागरिकांनी जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागत केले. इंदापूर येथे जाहीर सभेत बोलताना खा. चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, गेल्या चार वर्षाच्या सत्ताकाळात भाजपवाल्यांनी देशाला लुटण्याचे काम केले आहे. भ्रष्टाचारातून अफाट पैसा कमावला आहे. सत्ता आणि पैशाच्या मस्तीमुळे भाजपचे नेते उन्मत झाले आहेत त्यामुळे त्यांना सामान्यांचे हाल दिसत नाहीत. बेरोजगार युवकांच्या हाताला काम नाही. रोजगार मागितला तर पंतप्रधान पकोडे विका असे सांगून थट्टा करतात. राज्य सरकार कर्जमाफीच्या नावाखाली शेतक-यांची थट्टा करित आहेत. भाजप सरकार पश्चिम महाराष्ट्रावर जाणिवपूर्वक अन्याय करत आहे. ज्या सहकार चळवळीमुळे पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला ती सहकारी चळवळ व साखर उद्योग मोडून काढण्याचा प्रयत्न भाजप सरकारने चालवला आहे. इंदापूरच्या जागेबाबत आपण स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगून तुम्ही हर्षवर्धन पाटील यांच्या मागे ठामपणे उभे रहा असे आवाहन चव्हाण यांनी उपस्थितांना केले.

Previous articleआ.राम कदम यांना आठ दिवसात खुलासा करण्याचे महिला आयोगाचे आदेश
Next articleआ. राम कदम यांच्यावर कारवाई न झाल्यास विधानसभा चालू देणार नाही!