येत्या तीन वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलणार : मुख्यमंत्री 

येत्या तीन वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलणार : मुख्यमंत्री 

मुंबई : देशातील पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रो कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ च्या ३३.५ किमी लांबीच्या भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ या ठिकाणी झाले. यावेळी कोस्टल रोड, सी लिंक, मेट्रो आदी प्रकल्पांमुळे येत्या ३ वर्षात मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार असून एक आधुनिक शहर म्हणून पुढील काळात मुंबई पहायला मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

मुंबई मेट्रो ३ पॅकेज ७ मधील १.२६ किमी इतके भुयारीकरण आज पूर्ण झाले. या भुयारीकरणाच्या कामाचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले.

मुंबईकरांच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न खऱ्या अर्थाने सोडविण्यासाठी राज्य शासनाने मेट्रो चे विस्तृत जाळे उभे करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील मेट्रो ३ या महत्वाच्या मार्गिकेतील पहिल्या भुयारी टप्प्याच्या अनावरण सोहळ्याचे साक्षीदार होताना मला विशेष आनंद होत आहे. ही चांगली सुरूवात असून आणखी खूप मोठे काम करायचे आहे. मेट्रो ही मुंबईसाठी वरदान ठरणार आहे. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सुरक्षित, आरामदायी अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळणार असून भुयारी मेट्रोला एलिव्हेटेड मेट्रोने जोडल्यानंतर सार्वजिक वाहतुकीचे इंटिग्रेशन होऊन नागरिकांना मोठी सोय उपलब्ध होणार आहे.

मुंबईला शांघाय करण्याचे बोलले जात आहे. मात्र, आम्ही मुंबईला आधुनिक शहर म्हणून उभे करणार असून शांघायमधील नागरिकही २१ व्या शतकातील अतिशय चांगले शहर म्हणून मुंबई पहायला येतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारून सर्वांसाठी एकच तिकिट प्रणाली विकसित करण्यात येत आहे. यासाठी मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केलेले प्लॅटफॉर्म उत्तम असून निती आयोगाची टिम ते पाहण्यासाठी येणार आहे. त्यानंतर संपूर्ण देशात ही प्रणाली लागू होऊ शकते.राज्य शासनाने आखलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प आता प्रत्यक्षात सुरू होत आहे. एलिव्हेटेड रेल्वेचे कामही जोमाने सुरू झाले आहे. येत्या तीन वर्षात मुंबईचा चेहरा मोहरा बदलेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील,आमदार पराग अळवणी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, चीनचे कौन्सिल जनरल तांग गुओई, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, एल अँड टीचे एस.के. देसाई, स्टेकचे सु चांग आदी उपस्थित होते.

एमएमआरसीच्या व्यवस्थापकीयय संचालक श्रीमती अश्विनी भिडे म्हणाल्या, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देऊन हा यशाचा टप्पा गाठला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचे प्रभावी नेतृत्व, मुख्यमंत्री कार्यालयातील वॉररूमचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, सर्व भागधारक, आणि मुंबईकर नागरिकांचा भक्कम पाठिंबा आणि सहकार्य यामुळे मुंबई मेट्रो ३ च्या टीमला प्रकल्पातील अडथळे पार करून,या महाप्रकल्पाचे स्वप्न वेळेत पूर्ण करण्याची प्रेरणा वेळोवेळी मिळत आहे.

Previous articleअरुण अडसड यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड
Next articleमुख्यमंत्र्यांनी घेतला सहा मंत्र्यांच्या कामाचा आढावा