भाजपा विरोधात मुद्दा नसल्याने विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

भाजपा विरोधात मुद्दा नसल्याने विरोधकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई  : गेल्या चार वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीला देशात व महाराष्ट्रात सातत्याने निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करूनही सांगली व जळगाव महानगरपालिकांमध्ये भाजपाचाच विजय झाला. विरोधकांना भाजपाच्या विरोधात प्रचाराचा मुद्दा सापडत नसल्यामुळे त्यांनी दिशाभूल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी आज केले.

भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या वेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी., प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये, गणेश हाके व अवधूत वाघ उपस्थित होते.

दानवे म्हणाले की, भाजपाने राज्यातील जवळजवळ सर्व बूथमध्ये मजबूत संघटनात्मक बांधणी केली आहे. ‘वन बूथ ट्वेंटी फाईव्ह यूथ’ ही योजना अंमलात आणली आहे. निवडणूक यादीतील एकेका पानाची जबाबदारी कार्यकर्त्यांना दिली आहे. भाजपा आगामी निवडणूक संघटनात्मक बळावर जिंकेल.
आगामी निवडणूक शिवसेनेला सोबत घेऊन लढावी, असा आमचा प्रयत्न आहे. शिवसेनाही साथ देईल अशी आशा आहे, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

Previous articleसिध्दीविनायक मंदिर परिसरातील दुकानांवर पर्यावरणमंत्र्यांची धाड !
Next articleशरद पवार यांच्या विधानाचा विपर्यास केला : मलिक