शेतकरी संकटात असतांना विज बिलाची सक्तीने वसुली कशी करता :धनंजय मुंडे

शेतकरी संकटात असतांना विज बिलाची सक्तीने वसुली कशी करता :धनंजय मुंडे

मुंबई  : राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे आधिच संकटात असतांना त्याला आधार देण्या ऐवजी, मदत करण्या ऐवजी शेतकर्‍यांकडील विजेची थकबाकी सक्तीने वसुल करण्याचे आदेश कसे काय देता ? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला आहे. सरकारची ही कृृती म्हणजे मड्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया ही त्यांनी व्यक्त केली आहे.

मराठवाड्यासह राज्यातील सर्वच भागात पाऊसा आभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊसा आभावी शेतकर्‍यांची पिके पुर्णपणे गेली आहेत. आशावेळी उपलब्ध थोड्याशा शेतातील पाण्यावर पिके जगवण्याची शेतकर्‍यांना शेवटची आशा ऊरली आहे. शेतकरी हि पिके जगवण्याचा प्रयत्न करत असतांनाच महावितरणने एक पत्रक काढुन त्यांच्याकडील कृषी पंपाची, विजेची थकबाकी ३ हजार रूपये, ५ हजार रूपये या प्रमाणे वसुली करण्याचे आदेश काढले असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे.

महावितरणच्या संचालकांनी १९ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंत्यांना एक पत्र पाठवुन शेतकर्‍यांकडील विज बिलाची वसुली करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. सदर आदेश हे   उर्जामंत्र्यांसोबत १८ ऑगस्ट रोजी झालेल्या एका बैठकी नुसार  काढण्यात आल्याचेही या पत्रात म्हटले आहे.

शासनाच्या या सक्तीच्या सावकारी वसुली बाबत धनंजय मुंडे यांनी एका ट्विटद्वारे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. दुष्काळ जाहिर करून त्यांना वेगवेगळी मदत देणे आवश्यक असतांनाच महावितरण सक्तीने वसुली कशी करू शकते असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

हजारो कोट्यावधी रूपये घेवुन उद्योगपती रोज एक या प्रमाणे पळुन जात असतांना ते सरकारला दिसत नाहीत आणि शेतकर्‍यांकडील पाच, दहा हजार रूपयांची वसुली करण्याचेच कसे काय सुचते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

शेतकर्‍यां जवळ आज तीन हजार रूपयेच काय ? एक रूपयाची भरण्यासाठी पैसे नाहीत. मागील काळातील नुकसानीचे अनुदान अद्याप मिळालेले नाही, फसवी कर्जमाफी केली, पीक विमा मिळत नाही, महागाईमुळे ही शेतकरी त्रस्त झाला आहे, पीकवलेल्या मालाला हमी भाव मिळत नाही. चारी बाजुने शेतकरी संकटात सापडला असतांना महावितरणची ही सावकारी, जुलमी वसुली असल्याची टिका करून हे पत्रक तातडीने मागे घ्यावे, शेतकर्‍यांकडील सक्तीची विज बिल वसुली केवळ थांबवावी नव्हे तर त्यांचे विज बील माफ करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी हि मुंडे यांनी केली आहे.

 

Previous articleराफेल प्रकरणी शरद पवारांनी नरेंद्र मोदींना क्लीनचीट दिलेली नाही
Next articleमुंडे साहेबाची लेक आहे , शेतकऱ्याचा एकही पैसा बुडणार नाही