अभिनंदन कसले करता जनतेची माफी मागा : धनंजय मुंडे
मुंबई : केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारमुळेच पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता दर कमी केल्याबद्दल अभिनंदन कसले करून घेता उलट जनतेची माफी मागा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे भाव अल्पसे कमी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. त्यावरून सरकारला धारेवर धरतांना चार वर्ष लुट केल्यानंतर आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन दर कमी करण्याचा घेतलेला हा निर्णय म्हणजे सरकारला उशीरा सुचलेले शहाणपण आहे.
गुजरात राज्याने पेट्रोल आणि डीझेलच्या दरात कपात केली असतांना महाराष्ट्र सरकारने मात्र फक्त पेट्रोलच्या भावात कपात करून राज्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळणे असल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी दिली आहे.