“श्रद्धा असू द्या, सबूरी ठेवा” पंतप्रधानांनी साधला मराठीत संवाद

“श्रद्धा असू द्या, सबूरी ठेवा” पंतप्रधानांनी साधला मराठीत संवाद

शिर्डी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील अडीच लाख लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे झाला. याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. मोदी यांनी बहुतांश वेळ मराठीतून लाभार्थ्यांशी संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली. तसेच प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरवात आणि समारोपही मराठीतून केला.

‘हे श्री साईबाबांच्या समाधीचे शताब्दीचे वर्ष आहे. यानिमित्ताने आपल्या दर्शनाचा योग आला याचा मला अतिशय आनंद आहे.’ अशा शब्दात त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. तसेच आवास योजनेच्या  लाभार्थ्यांशी मराठीतून संवाद साधला. ई- गृहप्रवेश सोहळ्याची सुरवात झाली ती नंदुरबार जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी झालेल्या संवादाने. तेथील सिंगा वसावे या लाभार्थ्याने योजनेचा लाभ कसा मिळत गेला याविषयी सांगण्यास सुरवात केली. ‘नवीन घर मिळाले, आता तुम्ही प्रसन्न आहेत का?नवीन घर मिळाल्यामुळे मिठाई खाल्ली का?’ असा प्रश्न प्रधानमंत्री मोदी यांनी सिंगा वसावे यांना करीत माझ्यासाठी मिठाई पाठविणार का, अशी विचारणा केली. त्यांच्या कुटुंबियांची माहिती विचारण्यासोबतच नंदुरबारशी संबंधित आठवणींना उजाळा दिला.

सातारा येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांचे मार्गदर्शक लक्ष्मणराव इनामदार ऊर्फ वकिल साहेबांच्याआठवणींना उजाळा दिला. तसेच मोदी यांनी लाभार्थ्यांना आता पक्के घरकूल मिळाले असल्याने त्यांनी मुलांना शिकवावे. त्यांना उच्च शिक्षण द्यावे. शिक्षणामुळे गरिबीविरुद्ध लढण्यास बळ मिळते, असेही सांगत लाभार्थ्यांना शिक्षणाचे महत्व सांगितले. तसेच आगामी दिवाळीचा सण उत्साहात साजरा करावा, असे सांगताना दिवाळीत महाराष्ट्रात अंगणातील रांगोळी काढली जाते व दिवे लावले जातअसल्याचा उल्लेख आवर्जून केला. याशिवाय घर व परिसर, गावात स्वच्छता पाळावी, असेही आवाहन केले. सोलापूरच्या महिलांशी संवाद साधताना त्यांनी घरकूल महिलांच्या नावावर केले आहे, असे सांगत सोलापूरच्या कापड व्यवसायाची माहिती घेतली. सोलापूर येथून आपल्याला तेथे तयार केलेले जॅकेट नियमितपणे भेट मिळायचे असेही त्यांनी नमूद केले.

ठाणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी वारली पेंटिंगने घर सजविल्याचा उल्लेख करीत घरांना आधुनिक बनविल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात गीत व संगीताची आराधना केली जाते, असे सांगत या महिलांना पारंपरिक गीत म्हणण्याचा आग्रह केला.  महिलांनी ‘डोंगरीशेतमा’ या गीताच्या ओळी म्हटल्या. घरकूलाबद्दल त्या समाधानी आहेत काय, असेही त्यांनी लाभार्थ्यांना विचारले.
घरात सोयी सुविधा कोणत्या आहेत, वीज मिळाली का,उज्वला योजनेंतर्गत गॅसकनेक्शन मिळाल्याची चौकशी करीत आयुष्यमान भारत योजना याविषयीची सविस्तर माहिती दिली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी अमरावती, सोलापूर, नागपूर, ठाणे, लातूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांशी संवाद साधला. मोदी यांनी ‘श्रद्धा असू द्या, सबूरी ठेवा, साईबाबाचा आशिर्वाद आपल्या सर्वांना लाभो ही साईचरणी प्रार्थना’ अशा शब्दात त्यांनी भाषणाचा मराठीतून समारोप केला.

Previous articleहौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी कोणालाही फोन केले नाही
Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली पंकजा मुंडेंना शाबासकी