जाणून घ्या दुष्काळ सदृष्य जाहीर केलेले तालुके
मुंबई : सन २०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळी परिस्थितीच्या निकषाचे ट्रीगर २ लागू झालेल्या राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती असल्याचे आज राज्य शासनाने जाहीर केले. दुष्काळसदृष्य परिस्थितीवर उपाय योजना म्हणून या तालुक्यांमध्ये आठ विविध सवलतील लागू करण्यात आल्या असून संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सन २०१८ च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील सर्व तालुक्यांचे महा मदत संगणक प्रणालीद्वारे दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. या मुल्यांकनानुसार राज्यातील 201 तालुक्यांमध्ये ट्रिगर १ लागू झाले होते. या तालुक्यांचे प्रभावदर्शक निर्देशांकांचे मूल्यांकन करून ट्रिगर २ मध्ये समाविष्ट झालेल्या १८० तालुके आज जाहीर करण्यात करण्यात आले. या तालुक्यांमधील रँडम पद्धतीने १० टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल पाठविण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त व संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये जमीन महसुलातून सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदी उपाय योजना जाहीर केल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, यंदा राज्यात सरासरीच्या ७७ टक्के पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे राज्य सरकारने ट्रिगर वन व ट्रिगर टू प्रमाणे १८० तालुके हे दुष्काळसदृष्य घोषित केले आहेत. या तालुक्यांमधील शेतकरी, विद्यार्थी आदींसाठी आठ विविध प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. याचबरोबर राज्यातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणीचे काम जवळजवळ पूर्ण करण्यात आले आहे. त्या आधारावर पीक परिस्थितीचे आकलन समोर येत आहे. यानंतर लवकरच केंद्र शासनाचे पथक येऊन राज्यातील संपूर्ण परिस्थितीची पाहणी करणार आहे. त्यानंतर हे पथक दुष्काळाशी निगडित मदत जाहीर करेल. राज्य शासनाला अधिकार दिल्याप्रमाणे केंद्राच्या निकषाप्रमाणे दुष्काळसदृष्य परिस्थिती घोषित करून त्याच्या उपाययोजना करण्याचे काम राज्य शासनाने सुरू केले आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
दुष्काळ सदृष्य तालुक्यांची यादी पुढील प्रमाणे-
अहमदनगर जिल्हा – जामखेड, कर्जत, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा.
अकोला जिल्हा – अकोला, बालापूर, बार्शीटाकली, मूर्तीजापूर, तेल्हारा.
अमरावती जिल्हा – अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, मोर्शी, वरुड.
औरंगाबाद जिल्हा – औरंगाबाद, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर.
बीड जिल्हा – अंबेजोगाई, आष्टी, बीड, धरुर, गेवराई, केज, माजलगाव, परळी, पातोडा, शिरुर (कासार), वाडवणी.
भंडारा जिल्हा – लाखणी, मोहाडी, पवनी.
बुलडाणा जिल्हा – खामगाव, लोणार, मलकापूर, मोताळा, नांदूरा, संग्रामपूर, शेगाव, सिंदखेड राजा.
चंद्रपूर जिल्हा – भद्रावती, ब्रम्हपूरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिंपरी, नागभिड, पोंभूर्णा, राजूरा, सिंदेवाही, वरोरा. धुळे जिल्हा – धुळे, शिरपूर, सिंदखेडे.
गोंदिया जिल्हा – देवरी, मोरगाव अर्जूनी, सालेकसा.
हिंगोली जिल्हा – हिंगोली, कळमनुरी, सेनगाव.
जळगाव जिल्हा – अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर (एदलाबाद), पाचोरा, पारोळा, रावेर, यावल.
जालना जिल्हा – अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद, जालना, परतूर.
कोल्हापूर जिल्हा – बावडा, हातकणंगले, कागल, राधानगरी.
लातूर जिल्हा – शिरुर अनंतपाल.
नागपूर जिल्हा – कळमेश्वर, काटोल, नरखेड.
नांदेड जिल्हा – देगलूर, मुखेड, उमरी.
नंदुरबार जिल्हा – नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदे.
नाशिक जिल्हा – बागलाण, चांदवड, देवला, इगतपूरी, मालेगाव, नांदगाव, नाशिक, सिन्नर.
उस्मानाबाद जिल्हा – लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम.
पालघर जिल्हा – पालघर, तलासरी, विक्रमगड.
परभणी जिल्हा – मनवत, पालम, परभणी, पाथरी, सेलू, सोनपेठ.
पुणे जिल्हा – आंबेगाव (घोडेगाव), बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी पौड, पुरंदर सासवड, शिरुर घोडनदी, वेल्हे.
रायगड जिल्हा – माणगाव, श्रीवर्धन, सुधागड.
रत्नागिरी जिल्हा – मंडणगड, आटपाडी, जत, कडेगाव, कवठेमहांकाळ, खानापूर विटा, पलूस, तासगाव.
सातारा जिल्हा – कराड, खंडाळा, कोरेगाव, माण दहीवडी, फलटण, वाई.
सिंधुदुर्ग – वैभववाडी.
सोलापूर जिल्हा – अक्कलकोट, करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, मोहोळ, पंढरपूर, सांगोले, दक्षिण सोलापूर.
वर्धा जिल्हा – आष्टी, कारंजा, समुद्रापूर.
वाशिम जिल्हा – रिसोड.
यवतमाळ जिल्हा – बाभूळगाव, दारव्हा, कळंब, केळापूर, महागाव, मोरेगाव, राळेगाव, उमरखेड, यवतमाळ










