भर दुपारच्या उन्हात मंत्री प्रा.राम शिंदे यांचे शेतकऱ्यांसोबत सहभोजन
अहमदनगर : जिल्ह्यात पावसाने सगळीकडेच ओढ दिलीय. टंचाईच्या झळा सगळीकडे जाणवत आहेत. अशावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे भल्या सकाळपासूनच विविध गावांत जाऊन शेचकऱ्यांशी संवाद साधत आहेत. आपुलकीने विचारपूस करत, स्थानिक परिस्थितीची माहिती घेत राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचा दिलासा देत आहेत. याच दौऱ्यात भरदुपारी पालकमंत्री प्रा. शिंदे यांचा ताफा नगर तालुक्यातील कौडगाव शिवारातून जात असताना दोन शेतकरी न्याहारीसाठी थांबले होते. प्रा. शिंदे यांनीही ताफा तिकडे वळवला आणि चक्क त्यांच्यासोबत जेवायलाही बसले. राज्याच्या मंत्र्यांसोबत सहभोजनाची संधी मिळाल्याने शेतकरीही आनंदले..
गेल्या दोन दिवसांपासून पालकमंत्री प्रा. शिंदे जिल्ह्यात टंचाई परिस्थिचीची पाहणी करत फिरत आहेत. आज सकाळीच त्यांनी पिंपळगाव माळवीला भेट दिली. तेथे काशीबाई शिंदे यांनी प्रा. शिंदे यांना आपल्या व्यथा सांगितल्या. त्या ऐकून घेत प्रा. शिंदे यांनी तेथील तूर पिकाची पाहणी केली. टंचाई उपाययोजना करण्यास सांगितल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे आश्वस्त करुन ताफा पांगरमलच्या दिशेने रवाना झाला. तेथील शिवारात विष्णू आव्हाड यांच्या शेतातील कांदा पीक पाहिले. पाण्याअभावी पीक हातचं गेलेले. शेतातील विहीरीने तळ गाठलेला. प्रा. शिंदे यांनी पाहणी करुन धीर दिला.
त्यानंतर पाथर्डी रस्त्याने निघालेला ताफा कौ़डगाव शिवारात अचानक थबकला. पालकमंत्री प्रा. शिंदे थांबल्यामुळे बाकीची वाहनेही थांबली. प्रा. शिंदे आणि आमदार शिवाजीराव कर्डिले जवळच्या शेताकडे निघाले. समोर दोन शेतकरी झाडाखाली बसले होते. प्रा. शिंदे यांनीही तेथे बैठक मारली. सोबत नेहमीप्रमाणे असणारा जेवणाचा डबा त्यांनी काढला आणि चक्क शेतकऱ्यांसोबत पंगत बसली!
जगन्नाथ पवार आणि प्रभाकर सानप या ज्येष्ठ शेतकऱ्यांसोबत त्यांनी झुणका भाकऱीचा आस्वाद घेतला. पाऊसपाणी कसं आहे, याची विचारपूस केली. तब्बेत सांभाळण्याचा सल्ला दिला आणि त्यांचा निरोप घेऊन ताफा पुढील दौऱ्यासाठी रवाना झाला. पण, शेतकऱ्यांच्या आणि उपस्थितांच्या मनांत एक आठवण ठेवून!