ही तर शेतकऱ्यांची क्रूर थट्टा : प्रसाद तनपुरे

ही तर शेतकऱ्यांची क्रूर थट्टा : प्रसाद तनपुरे

राहुरी : नगर जिल्ह्याचे पाणी जायकवाडी धरणात सोडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरुन राजकारण चांगलेच पेटले आहे. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या निर्णयास कडाडून विरोध सुरु केला आहे. विविध पक्ष संघटनांनी जायकवाडीला नगरचे पाणी देण्यास विरोध सुरु केला असून नगर मनमाड मार्गावर चक्का जाम आंदोलन केले. यावेळी बोलताना माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

तनपुरे म्हणाले की, जायकवाडीला पाणी देण्याचा निर्णय झाल्यावर भाजपचे आमदार सरकारला त्याविरोधात निवेदन देतात, ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला असला तरीही दुष्काळात होरपळणाऱ्यांच्या तोंडचे पाणी काढून नेणे चुकीचे आहे. सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, असा हल्ला त्यांनी चढवला. जायकवाडीत सध्या पुरेसा पाणीसाठा आहे. बिअर कारखान्यांना पाणी देऊ नका, असेही तनपुरे यांनी सांगितले. सरकारला वास्तवाचे भान नाही, असा आरोप करुन त्यांनी म्हटले की, सरकारच्या या अत्यंत चुकीच्या निर्णयामुळे नगर जिल्ह्याला आठ महिने पाणी टंचाईला तोंड द्यावे लागेल.

दरम्यान, जायकवाडीला पाणी सोडण्चाची तयारी पूर्ण झाली असून प्रवरा नदीकाठच्या गावांतील वीजपुरवठा बंद करण्यात आला असून, पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
जायकवाडी धरणात नाशिकमधील भंडारदरा धरण आणि नगरमधील तीन धरणातून ९ टीएमसी पाणी सोडायचा निर्णय सरकारने घेतला. दारणा धरणात हे पाणी साठवून नंतर विसर्ग करण्यात येणार आहे. मात्र यावर राजकीय वादही पेटला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने यास जोरदार विरोध केला आहे. नगर भाजपही पाणी सोडण्याच्या विरोधात असल्याचे सांगण्यात येत असले तरीही मुख्यमंत्र्यांकडे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी निवेदन दिले आहे.

Previous articleओला-उबेर चालक मालकांच्या संपात सरकारने हस्तक्षेप करावा : मुंडे 
Next articleशिवस्मारक सरकार बांधत आहे, भाजप नाही : उद्धव ठाकरे