शिवस्मारक सरकार बांधत आहे, भाजप नाही : उद्धव ठाकरे
मुंबई : मुंबईजवळ अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी बुधवारी गेलेली बोट बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यु झाला. भाजपचा सत्तेतील भागीदार शिवसेनेने भाजपचा खरपूस समाचार सामना मधील अग्रलेखातून घेताना शिवस्मारक सरकार बांधत आहे, भाजप नाही, याची आठवण करुन दिली आहे. भाजपला कानपिचक्या देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांनी स्मारक जणू भाजपच्या मालकीचे आहे, अशा पद्धतीचे चित्र तयार केले जात आहे, असा घणाघात केला. स्मारक प्रथमपासूनच राजकारणात अडकले असून बुडालेल्या बोटीबरोबरच स्मारकाचे राजकारणही संपावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पायाभरणी रद्द झाली, ही कोणत्या अपशकुनाची सुरुवात आहे, असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. स्मारक जणू आपल्या मालकीचे आहे, अशा थाटात वागणाऱ्या भाजपने इतर कुणी पायाभरणी समारंभात सहभागी होऊ नये, असा अट्टाहास केल्यानेच हा दुर्दैवी प्रकार घडल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. ऐनवेळी भाजपमध्ये दाखल झालेल्या शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना जरी स्मारक समितीचे अध्यक्षपद दिले असले तरी सर्व सूत्रे मुख्यमंत्री कार्यालयातूनच हलवली जात आहेत. शिवस्मारकाची कंत्राटे देण्यावरुन बेछूट आरोप होत आहेत, असेही अग्रलेखात म्हटले आहे. स्मारक भाजपच्या निधीतून होत आहे, असे समजून सर्व चालले आहे. पण सरकार स्मारक बांधतेय, भाजप नाही, अशा कानपिचक्या ठाकरेंनी दिल्या आहेत.
शिवरायांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात होणे ही अभिमानाची बाब असली तरी केवळ स्मारकाचे टेंडर निघाले किंवा रखडले तरीही त्यावर छत्रपतींचे आमच्या ह्रदयातील स्थान अवलंबून नाही, असे भाजपला ठाकरे यांनी ठणकावले आहे.