राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर १५ दिवसांत कार्यवाही पूर्ण करु :मुख्यमंत्री
अकोला: मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अद्याप सरकारला मिळालेला नाही. मात्र हा अहवाल आल्यावर १५ दिवसांच्या आत त्यावर वैधानिक कार्यवाही पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.अहवाल फुटलेला नाही. त्यातील शिफारशींबद्दलच्या बातम्या म्हणजे पतंगबाजी असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मराठ्यांना आरक्षण द्यावं की नाही, याबाबत निर्णय याच आयोगाच्या अहवालाच्या आधारे होणार असून, तो उद्या राज्याच्या मुख्य सचिवांकडे सादर केला जाण्याची शक्यता आहे.अहवालातील शिफारशींबाबत विविध वाहिन्यांतून अनेक बातम्या येत आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्व अंदाज आहेत, असे सांगितले. मात्र अहवाल मिळाल्यावर १५ दिवसांच्या आत वैधानिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले.