सत्तेतील कुंभकर्णामुळे मंदिर झाले नाही : उध्दव ठाकरे
मुंबई: राम मंदिराच्या मुद्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंब आज अयोध्येला रवाना होत असतानाच शिवसेनेने भाजपचे नाव न घेता जोरदार टोले लगावले आहेत. सत्तेतील कुंभकर्णांमुळे राम मंदिर होऊ शकले नाही, असे उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे.
सत्तेसाठी असंख्य वाल्यांना तुम्ही पवित्र केले. पण ज्या रामाने राजकीय वैभव दिले तो राम वनवासातच आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे. महाभारत पाच गावांसाठी घडले पण आता हे महाभारत राम मंदिरासाठी सुरू आहे. राम मंदिराची उशी करुन जे झोपले होते, त्यांचे डोळे उघडण्याचे काम शिवसेनेने नक्कीच केले आहे. प्रचंड लढ्यानंतर राम मंदिर उभे राहू शकले नाही ते सत्तेतील कुंभकर्णांमुळे. निवडणुका आल्या म्हणून जागे होऊ नका, असे ठाकरेंनी भाजपला सुनावले आहे.
कुंभकर्ण आता उठले नाहीत तर कायमचे झोपून जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. भाजपने रामाला अयोध्येतच वनवासी बनवले.शिवसेनेचा अयोध्येशी काय संबंध असा प्रश्न करणाऱ्यांनी हा इतिहास समजून घेतला पाहिजे. बाबरी पाडूनही मंदिर उभे राहत नाही, हा रामाचा आणि हिंदुत्वाचा अपमान असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे.