आरक्षण टिकवण्याची लढाई आता सुरू:चंद्रकांत पाटील
कोल्हापूर: मराठ्यांना आरक्षण मिळाले आहे. पण आता ते टिकवण्यासाठी न्यायालयात लढाई सुरू करावी लागणार आहे. मराठ्यांना मागासवर्ग आयोगानेच मागास ठरवल्याने अर्धी लढाई जिंकलीच आहे. न्यायालयात सरकारच्या बाजूने तज्ञ वकिलांची फौज असल्याने न्यायालयातही टिकेल, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
शिवरायांनी गनिमी कावा करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. तसाच गनिमी कावा करणे आवश्यक होते. तो मी आणि मुख्यमंत्र्यांनी मिळून केला, असे पाटील यांनी सांगितले.
अहवाल पटलावर ठेवू नये, असे आम्ही वारंवार सांगत होतो. न्यायालयात मराठ्यांच्या मागासलेपणाला आव्हान दिले जाऊ शकते. तसेच ५० टक्क्यापेक्षा अधिक आरक्षणालाही आव्हान दिले जाईल. म्हणून आम्ही हरीश साळवे यांच्यासारख्या तज्ञ वकिलांना आमची बाजू मांडण्यास सांगितले आहे, असेही ते म्हणाले. आरक्षणासाठी बऱ्याच कलमांचा आधार घेतला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार, यात काही शंका नाही, असेही पाटील यांनी सांगितले. मराठ्यांना उरलेल्या ३२ टक्क्यातही अर्ज करता येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.