राज्यातील युती सरकार हे सर्वात मोठे विघ्न : चव्हाण

राज्यातील युती सरकार हे सर्वात मोठे विघ्न : चव्हाण

यवतमाळ : देशातील आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकार हे सर्वात मोठे विघ्न आहे. हे विघ्न दूर करण्यासाठीच काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून केंद्रातील व राज्यातील सरकार घालवल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.

काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याचा प्रारंभ आज यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील चिंतमाणी गणेशाचे दर्शन घेऊन झाला. त्यानंतर यवतमाळ शहरातील विराट जनसघंर्ष सभेला मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी बोलताना खा. अशोक चव्हाण यांनी भाजप शिवसेना सरकारवर सडकून टीका केली ते म्हणाले की गेल्या साडेचार वर्षात भाजप शिवसेनेचे सरकार एकही प्रश्न सोडवू शकले नाही. राज्यात सतरा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. स्वतःचे सरण रचून शेतकरी आत्महत्या करित आहेत. पण सरकार आत्महत्या थांबवण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही. त्यामुळे राज्यातले सरकार नेमके कोणत्या कामात व्यस्त आहे? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.  काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात देशात विकासात, उद्योग धंद्यात प्रथम क्रमांकावर असणारा माहाराष्ट्र फडणवीसांच्या काळात शेतकरी आत्महत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर गेला आहे.

भाजपचे नेते पंतप्रधान मोदी विष्णूचा अवतार असल्याचे म्हणतात तर राज्यातले एक मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दैवी शक्ती प्राप्त आहे असे सांगतात. त्यांच्या सांगण्याप्रमाणे फडणवीस यांच्याकडे दैवी शक्ती असेल तर त्यांच्या कार्यकाळात इतक्या शेतक-यांनी आत्महत्या का केल्या? राज्यात दुष्काळ कसा पडला? असे प्रश्न उपस्थित करून भाजपवाले देव नाही तर दानव आहेत असे खा. चव्हाण म्हणाले.

भाजपचे नेते होर्डिंग बॅनर लावून मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आरक्षणाचे श्रेय समस्त समाजाचे आहे. मराठा आरक्षण दिले म्हणून ढोल बडवणा-यांनी मुस्लीम व धनगर आरक्षणाचे काय झाले? ते सांगावे असे खा. चव्हाण म्हणाले.

यवतमाळ जिल्ह्यावर भाजप शिवसेना सरकारने अन्याय आले आपल्या राजकीय फायद्यासाठी भाजपने गुन्हेगारांना अभय दिल्याने यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. या सरकारच्या काळात यवतमाळ जिल्ह्यात एकही नविन उद्योग आला नाही. एकाही तरूणाला रोजगार मिळाला नाही.  नोक-या मागणा-या तरूणांना पंतप्रधान पकोडे विकायला सांगत आहेत.  काल पोहरादेवी येथे येऊन मुख्यमंत्री शंभर कोटी रूपये देऊ असे आश्वासन देऊन गेले मात्र दोन दिवसांपूर्वी ते साईबाबा संस्थानचे ५०० कोटी रूपये घेऊन गेले. हे देवाच्या कामासाठी पैसे देणारे नाहीत तर देवाचे पैसे घेऊन जाणारे आहेत. गेल्या साडेचार वर्षात सांगण्यासारखे एकही काम केले नाही त्यामुळे भाजप शिवसेनेवाले आता मतांसाठी रामाचे नाव घेत आहेत असे चव्हाण म्हणाले

Previous articleराज ठाकरे यांच्या दंगलीबाबतच्या आरोपाला खा. संजय राऊत यांनी काय उत्तर दिले ?
Next articleकुंभकर्णासारख्या झोपलेल्या सरकारला जागं करणार : उध्दव ठाकरे