आम्हाला प्रकाश आंबेडकरांची साथ हवी :अशोक चव्हाण
अमरावती: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील आगामी निवडणुकीसाठी जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली असून, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आम्हाला साथ हवी असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज सांगितले. भाजप सरकारविरोधातील कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज अमरावतीमध्ये दाखल झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
चव्हाण म्हणाले की, आघाडी करण्याबाबत कॉंग्रेस सकारात्मक आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांचे निवडणूक निकाल लागल्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होईल.प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची आघाडीची बोलणी सुरू आहेत. पण एमआयएमला मात्र आघाडीत घेता येणार नाही. आम्हाला प्रकाश आंबेेडकरांची साथ हवी आहे. गेल्या साडेचार वर्षात जनतेचा हिरमोड झाला आहे. कॉंग्रेस पक्षच सत्तेत हवा आहे, लोकामची हीच भावना लक्षात घेऊन आम्ही जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आम्ही लोकांशी संवाद साधणार आहोत, असेही ते म्हणाले.
राज्यात पडलेल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पथक पाठवले आहे. याचा अर्थ केंद्राचा आपल्या सरकारवर विश्वास नाही. ही पाहणी म्हणजे एक फार्स आहे, असा आरोपही त्यांनी केला.
अशोक चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीका केली. निवडणुकांच्या तोंडावर कॉंग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांना त्रास देण्याचा उद्योग भाजपने सुरू केला आहे. वेगवेगळी प्रकरणे उकरून काढली जात आहेत, असे ते म्हणाले.
महात्मा गांधी यांचे नाव भाजप घेत आहे. पण त्यांनी गांधीजींचे नाव घेण्याचा अधिकार नाही. स्वातंत्र्यलढ्यात भाजपचे कुत्रे तरी मेले का, अशी खोचक टीकाही अशोक चव्हाण यांनी केली.