सरकारला प्रशासनाकडून काम करूनच घेता येत नाही : अजित पवार
पुणे: चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असतानाच सरकारने दुष्काळ उशिरा जाहीर केला. केंद्रीय पथक आता राज्यात आले. ते दिल्लीला जाणार, अभ्यास करणार. तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचे, असा सवाल करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर तोफ डागली. या सरकारला प्रशासनाकडून कामच करून घेता येत नाही, अशी टीका त्यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागातर्फे पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, कारखाने सुरू आहेत तोपर्यंत काही नाही. पण नंतर चाऱ्याअभावी पशुपालकांचे आणि गुरांचे हाल होतील. एसीत बसणाऱ्या प्रशासनाला दुष्काळाची धग काय समजणार, असा सवाल त्यांनी केला. या पाहणी पथकाकडे शेतकरी गाऱ्हाणी मांडतात तर अधिकारी सांगतात चारा पेरा. जेथे पाणी नाही, कुसळही उगवत नाही तेथे हे अधिकारी चारा पेरायला सांगत आहेत. नीरव मोदी, मल्ल्याला सवलत दिली जाते. परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी नावापुरतीच असल्याची जोरदार टीका पवारांनी केली.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याच्या मोठ्या जाहिराती सरकारने केल्या. प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना अजित पवार यांनी हात वर करण्यास सांगितले. तेव्हा एकाही शेतकऱ्याने हात वर केला नाही. याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे, असे अजित पवारांनी यावर सुनावले.