रामदास कदम आणि नितेश राणेंच्यात जुंपली !
रत्नागिरी: नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष आता चांगलाच पेटला आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल रत्नागिरीत बोलताना नारायण राणे हा कोकणाला लागलेला काळा डाग आहे. तो धुऊन काढल्याशिवाय मी शांत राहणार नाही, अशी टीका केली होती. त्याला राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले असून, रामदास कदम हे उद्धव ठाकरे यांनी पाळलेला कुत्रा आहे, असे ट्विटरवरून उत्तर दिले आहे.
नितेश राणे यांनी आज सकाळी ट्विट करून कदम यांना सुनावले आहे. त्यांनी म्हटले आहे की, स्व. बाळासाहेब ठाकरे असतील किंवा राजसाहेब असतील, यांना कुत्रे आवडतात. उद्धव ठाकरे यांनीही तीच परंपरा सुरू ठेवली आहे.रामदास कदम यांच्या रुपात सतत भुंकत असतो. त्याला हे माहीत नाही की भुंकणारे कुत्रे कधी चावत नाहीत.
काल कदम रत्नागिरीत आले असताना त्यांनी राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. कदम म्हणाले की, या राणेंनी आतापर्यंत किती पक्ष बदलले. शिवसेना सोडून ते कॉंग्रेसमध्ये गेले आणि आता भाजपमध्ये आले आहेत. त्यांच्यासाठी आता फक्त रामदास आठवलेंचा पक्ष उरलाय. राणे मातोश्रीवर टीका करतात पण त्यांनी तेवढी आपली औकात आहे का हे बघावे. शिवसेनेच्या जोरावर राणे आणि त्यांच्या मुला बाळांनी कोट्यवधीची संपत्ती जमवली. सूर्याजी पिसाळ ही उपमा देखील त्यांना कमीच पडेल.निवडणूक जशी जवळ येत जाईल तशी हा संघर्ष आणखी टोकाचा होत जाणार आहे.