महापुरूषांच्या नावाचा सरकारकडून केवळ राजकीय वापर : विखे पाटील
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या दिनदर्शिकेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीचा उल्लेखच नसल्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र टीका केली आहे. हे सरकार महापुरूषांच्या नावाचा केवळ राजकीय सोयीसाठी वापर करीत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, महाराष्ट्र शासनाच्या यंदाच्या दिनदर्शिकेमध्ये अनेक गंभीर त्रुटी दिसून आल्या आहेत. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीची उल्लेख यंदाच्या दिनदर्शिकेत करण्यात आलेला नाही. यावरून या दोन्ही महापुरूषांचा सरकारला विसर पडला आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. केवळ आपल्या राजकीय सोयीसाठी महापुरूषांच्या नावाचा वापर करण्याची सरकारची भूमिका या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. दिनदर्शिकेत झालेली ही चूक अत्यंत गंभीर असून, सरकारने याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली.










