अर्थसंकल्पावर सेनेचा नरमाईचा सूर

मुंबई नगरी टीम

 मुंबई: नेहमी भाजपवर मुखपत्रातून जोरदार टीकेचे आसूड ओढणाऱ्या शिवसेनेने आजच्या अग्रलेखात नरमाईचा सूर लावला आहे.अच्छे दिनचे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेत आले.आताही बजेटमध्ये अच्छे दिनचे आश्वासन दिले आहे.पण खरोखर अच्छे दिन येणार का,हा प्रश्नच आहे,असा सौम्य टोला शिवसेनेने लगावला आहे.यामुळे शिवसेना भाजपशी पुन्हा युती करणार का,अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अग्रलेखात म्हटले आहे की,मोदी सरकारसाठी निवडणुकीपूर्वी ही अखेरची संधी असल्याने अंतरीम अर्थसंकल्पाचे स्वरूप पूर्ण अर्थसंकल्पासारखे ठेवले आहे.नोटबंदी आणि इतर धोरणामुळ नाराज घटकांना खुश करण्याचा पुरेपूर प्रयत्न मोदींनी केला आहे.शेतकऱ्यांना सहा हजाराची मदत, असंघटित कामगारांना पेन्शन वगैरे निर्णय क्रांतिकारी असल्याचा सरकारचा दावा असून त्यास विनाकारण आक्षेप घेण्याचे कारण नाही,असे सांगत सरकारची पाठ थोपटली आहे.मात्र खरोखर अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील तेव्हाच हा वादा आणि दावा खरा ठरला,असे म्हणता येईल,असा टोलाही लगावला आहे.अर्थसंकल्पातील कोटीच्या कोटी उड्डाणे साध्य करण्यासाठी लागणारा पैसा सरकारकडे आहे का,असे प्रश्न विचारले जातील.पण सरकारने त्याचा विचार केला असणारच,असे म्हणत शिवसेनेने पुन्हा सरकारची पाठराखण केली आहे.अंतरीम अर्थसंकल्पाच्या मर्यादा आणि लोकसभा निवडणूक ही कसरत सांभाळत सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प मतांसाठी असले तरीही सर्वांसाठीच दिलासादायक आहे,असे शिवसेनेने म्हटले आहे.अग्रलेखातील एकूण सुरावरून शिवसेना भाजपशी पुन्हा जुळवून घेण्याच्या आणि युतीच्या तयारीत असल्याच्या शक्यतेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Previous articleमी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही : नितीन गडकरी
Next articleमाझ्या जिवाचे बरेवाईट झाल्यास मोदीच जबाबदार : अण्णा हजारे