राज्यात मागील वर्षी ३० हजार रस्ते अपघातात १३ हजार मृत्यू

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात वाहनांची संख्या ही ३ कोटी २९ लाख इतकी झाली आहे. त्यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या अधिक आहे. राज्यात मागील वर्षी जवळपास ३० हजार रस्ते अपघात झाले, त्यामध्ये १३ हजार जणांना आपले प्राण गमवावे लागले. यापैकी सुमारे ११ हजार मृत्यू म्हणजे ८० टक्के मृत्यू हे मानवी चुकांमुळे झाल्याचे समोर आले आहे. अपघातांची आणि त्यातून होणारी मनुष्यबळाची हानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. हे रोखण्यासाठी सर्वांनी रस्ते सुरक्षेबाबत जाणीव ठेवून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा राज्य रस्ता सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे केले.

परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस शाखेमार्फत राज्यभरात ४ ते १० फेब्रुवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. आज येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंत्री रावते यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री रावते म्हणाले की, राज्यात २०१६ मध्ये १२ हजार ९३५, २०१७ मध्ये १२ हजार ५११ तर २०१८ मध्ये १३ हजार ५९ अपघाती मृत्यू झाले. वाहनांच्या वेगाबरोबर अपघातांची आणि त्यातील मृत्यूंची संख्या वाढत आहे. मुंबई – पुणे एक्सप्रेस वे हा तर अती वेगामुळे मृत्यूचा सापळा झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे आवश्यक व कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे. पण शासनाने हेल्मेटची सक्ती केली, असे म्हणत या चांगल्या मोहिमेबाबत अपप्रचार केला जात आहे. वृत्तपत्रांनीही या मोहीमेला ‘सक्ती’ असे न म्हणता हेल्मेटच्या आवश्यकतेबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

परिवहन आयुक्त शेखर चन्ने यावेळी म्हणाले की, राज्यात ३ कोटी ४१ लाख इतके परवानाधारक वाहनचालक आहेत. राज्यात अपघातांचे प्रमाण ०.३६ टक्क्यांनी कमी झाले असले तरी अपघाती मृत्यूचे प्रमाण मात्र ४ टक्क्यांनी वाढले आहे. पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकी यांच्या अपघातांचे प्रमाण हे ६६ टक्के इतके आहे. तसेच अपघाती मृत्यूमध्ये २५ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. राज्यात १ हजार ३२४ इतके ब्लॅक स्पॉट असून ते काढून टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

मुंबई शहरात अतीवेग आणि बेदरकार वाहन चालविल्याप्रकरणी २०१७ मध्ये ४१ हजार कारवाया करण्यात आल्या होत्या. पण त्यानंतर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अशी बेदरकार वाहने आता कारवाईच्या टप्प्यात येत आहेत. १ जानेवारी २०१८ पासून शहरात अशा ७ लाख ७० हजार लोकांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबईचे पोलीस सहआयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार यांनी यावेळी दिली. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सध्या मुंबईत ई-चलानद्वारे कारवाई करण्यात येते. लवकरच संपूर्ण राज्यात ई-चलानद्वारे कारवाईची यंत्रणा सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह म्हणाले, देशात सर्वात जास्त अपघात तसेच अपघाती मृत्यू हे महाराष्ट्रात होतात. हे रोखण्यासाठी रस्ते अपघाताविषयी लोकांचे प्रबोधन करण्याबरोबरच अभियांत्रीकी सुधारणा तसेच रस्ते सुरक्षाविषयक अंमलबजावणीवर भर देण्यात येत आहे, असे ते म्हणाले.

३० वर्षाहून अधिक काळ विनाअपघात सेवा देणाऱ्या एसटी महामंडळाच्या चालकांचा यावेळी मंत्री श्री. रावते यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यात एसटी वाहनचालक किरण पोतदार (महाड आगार), अशोक भोसले (मुंबई सेंट्रल आगार), गोपीनाथ वाकळे (संगमनेर आगार), विजयकुमार स्वामी (सोलापूर आगार), आनंदराव सोनकर (ठाणे २ आगार) यांना सन्मानित करण्यात आले. तसेच रस्ता सुरक्षा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. एसटी बसला आग लागली असता ती विझविण्यासाठी शर्थ करणारे कोथरुड (पुणे) अग्निशमन दलाचे योगेश चव्हाण यांनाही यावेळी मंत्री  रावते यांच्या हस्ते १० हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

आमदार विद्या चव्हाण, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगांवकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सहपरिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी आभार मानले. जे जे स्कूल ऑफ आर्टस्, मुंबई विद्यापीठ आणि अंजुमन ए इस्लामच्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानात सहभाग घेतला.

Previous articleखिशात नाय दमडी अन गावजेवणाचू पिटतेय दवंडी : जितेंद्र आव्हाड
Next articleम्हाडाच्या संक्रमण श‍िब‍िरातील रह‍िवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार