मोदी सरकार देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही
मुंबई नगरी टीम
बारामती : दहशतवादी हल्ल्याच्या इशा-यामुळे मुंबईत हाय अँलर्ट जारी करण्यात आला आहे. देशभर अस्वस्थता पसरली असताना सरकार दहशतवादाबद्दल गंभीर नाही, ही बाब दुर्दैवी आहे, असा आरोप आज राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
धनगर आरक्षणावरूही त्यांनी सरकारला धारेवर धरले.दोन्ही सरकारे धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा हल्ला त्यांनी चढवला.राज्य सरकारने धनगर आरक्षण विषयक कोणताही प्रस्ताव. केंद्राला पाठवला नसल्याने धनगर आरक्षण लटकले असल्याचे त्या म्हणाल्या.बारामती रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या कामांची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली.सातत्याने सुरक्षा आणि रोजगाराबाबत आश्वासन दिले जात होते.सध्या दहशतवादाशिवाय दुसरे काही ऐकायला मिळत नाही.केवळ भाषणात ५६इंची छातीबद्दल सांगितले गेले.नोटबंदीमुळे दहशतवाद कमी होणार असल्याचे म्हटले होते.मात्र दोन वर्षात कधी नव्हे इतकी अस्वस्थता पहायला मिळते आहे,असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला.
धनगर समाज आरक्षण विषयावर मुंबईत काल झालेली बैठक निष्फळ ठरल्याचे आश्चर्य वाटत नाही,असे त्या म्हणाल्या.बारामतीमध्ये आंदोलन झाल्यावर दिलेले आश्वासन फसवे आहे,हे तेव्हा जाणवले होते.केंद्र आणि राज्य सरकार या कष्टकरी समाजाची फसवणूक करत असल्याची जोरदार टीका सुप्रिया सुळे यांनी केली.सरकारने शेतकऱ्यांचे खच्चीकरण केल्याने देश विकासात मागे पडल्याचा आरोप त्यांनी केला.शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम. या सरकारने केले आहे।चुकीचे काम करणाऱ्या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे,असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.