मुंबई नगरी टीम
मुंबई : बस आणि रिक्षा अपघातात बस मधील मृत व्यक्तींच्या वारसांना ज्याप्रमाणे १० लाखाची मदत मिळते त्याचप्रमाणे रिक्षामधील मृत पावलेल्या व्यक्तिच्या कुटुंबियांनी दहा लाखाची आर्थिक मदत मिळावी व मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका वारसाला शासकीय सेवेत नोकरी देण्याची आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली.नाशिक विभागातील कळवण आगाराच्या बसला झालेल्या अपघातातील एस.टी.बसच्या प्रवाशांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.तर ऑटोरिक्षातील प्रवाशांना दोन लाख रुपयांची मदत विशेष बाब म्हणून देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी विधानपरिषदेत केली.
नाशिक जिल्ह्यातील सौंदाणे- देवळा रसत्यावर कळवण-धुळे येथे झालेल्या एसटी बस च्या विचित्र अपघातात बसमधील १७ व रिक्षामधील ९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याविषयी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.बस दुर्घटनेत मृत पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये व रिक्षा प्रवासातील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये मदत दिली जाते. मग बस प्रवासी आणि रिक्षा प्रवासी या दोघांना वेगवेगळे न्याय का? हा दुजाभाव का.तसेच वाहनांचे अपघात का होतात कसे होतात याच्या मुळाशी जाणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.त्याचप्रमाणे एसटीने सुरु केलेल्या शिवशाही या गाड्यांचे फक्त मॉडेल बदललेले आहे. पण या गाड्यांचे इंजिन तेच आहे. यामुळे राज्यात एसटी बसेसच्या अपघातात वाढ झाली आहे असे दरेकर यांनी सांगितले.
नाशिक विभागातील कळवण आगाराच्या बसला झालेल्या अपघातातील एस.टी.बसच्या प्रवाशांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर ऑटोरिक्षातील प्रवाशांना दोन लाख रुपयांची मदत विशेष बाब म्हणून देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी विधानपरिषदेत सांगितले.बसमधून एकूण ५० प्रवासी व चालक, वाहक २ असे एकूण ५२ व्यक्ती प्रवास करीत होते. त्यापैकी १६ प्रवासी व १ चालक असे १७ व ॲपे रिक्षामधील ८ प्रवासी व १ चालक असे एकूण २६ व्यक्ती मृत पावले होते. बसमधील मृत प्रवाशांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. तर ॲपेतील ९ मृत व्यक्तींच्या वारसांना २ लाख रुपये विशेष बाब म्हणून मदत देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.