दिलासा : पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या संकटामुळे अभ्यासाच्या तणावाखाली असलेल्या इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक २०२०-२१ या शेक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी साठी सुमारे २५ टक्के पाठ्यक्रम कमी करण्याची घोषणा राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या प्रस्तावास शासन मान्यता देण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा १५ जूनपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून विविध माध्यमातून शिक्षणाचे मार्ग सुरू केले आहेत. असे शिक्षण मंत्री गायकवाड यांनी सांगितले. राज्यातील कोरोनाच्या  परिस्थितीचा ताण विद्यार्थ्यांवर येऊ नये, त्यांच्यावर कोणतेही दडपण घेऊ नये यासाठी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात २५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून,याची संपूर्ण माहिती संचालक राज्य शैक्षणिक व संशोधक परीक्षक महाराष्ट्र, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवरील मोठा ताण कमी झाला आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (बोर्ड) यांच्या समन्वयाने आणि अभ्यासक्रम समितीच्या निर्णयानुसार संबंधित विषयाचे सर्व अभ्यासक्रम मंडळ सदस्यांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अभ्यासक्रमाचा मूळ गाभा तसाच ठेवून प्राथमिक स्तरावरील २२, माध्यमिक स्तरावरील २० आणि उच्च माध्यमिक स्तरावरील ५९ असे एकूण १०१ विषयांचा इयत्ता निहाय, विषय निहाय २५ टक्के पाठ्यक्रम कमी करण्यात येत असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली आहे.

असा आहे निर्णय

  • पाठ्यक्रमातून २५ टक्के भाग वगळत असताना भाषा विषयामध्ये काही गद्य व पद्य पाठ व त्यावर आधारित स्वाध्याय कृती वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अंतर्गत मूल्यमापन आणि वार्षिक परीक्षा यामध्ये या घटकांवर कोणत्याही कृती विचारल्या जावू नयेत.
  • भाषा विषयामध्ये वगळण्यात आलेल्या पाठाला जोडून आलेले व्याकरण किंवा इतर भाषिक कौशल्य वगळण्यात आलेली नाहीत.
  • इतर विषयामध्ये कृतीची पुनरावृत्ती टाळणे तसेच काही भाग विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी देण्यात आला आहे.
  • शालेय श्रेणी विषयासंदर्भात परिस्थिती व त्यानुसार उपलब्ध सोयी सुविधा यांचा विचार करून उपक्रम , प्रकल्प घेण्याबाबत सूचित केले आहे.
  • प्रात्यक्षिकांवर आधारित विषयांचे प्रात्यक्षिक कार्य हे अध्ययन – अध्यापन संदर्भाने विचारात घेतलेल्या आशयास अनुसरूनच उपलब्ध परिस्थिती व सोयी सुविधा विचारात घेवून पूर्ण करणेबाबत सूचित केले आहे.
  • राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या मार्फत शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. त्या दिनदर्शिकेमधून पाठ्यक्रमातून कमी करण्यात आलेला भाग वगळण्यात येत आहे.
  • इयत्ता १ ली ते १२ वी चा इयत्ता निहाय, विषय निहाय २५ % पाठ्यक्रम कमी करण्यात आलेला भाग maa.ac.in आणि www.ebalbharati.in या वेबसाईट वर प्रकाशित करण्यात येत आहे.
  • शाळा प्रमुखांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी सदर पाठ्यक्रम वगळल्याची नोंद घेवून त्याबाबत सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना अवगत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
Previous articleशरद पवारांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाची स्तुती
Next articleपुण्याच्या “त्या” आजींच्या मदतीला धावले गृहमंत्री; लाखाची केली मदत