मंत्रालयात रंगले दिड तास आत्महत्येचे नाट्य
मंत्र्यांच्या मध्यस्थीने अखेर तरूणाचे मन परिवर्तन
मुंबई दि. १० सोयाबीन आणि कपाशीला भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ आणि राज्य सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या मागणीसाठी ज्ञानेश्वर साळवे रा.मसलाखुर्द, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद या तरुण शेतकऱ्याने आज विस्तारीत इमारती मधिल सातव्या माळ्यावरील सज्ज्यावर जावून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुमारे दीड तास चाललेल्या या नाट्यामुळे मंत्रालयात एकच तारांबळ उडाली होती. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रणजित पाटील आणि दीपक केसरकर यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर तब्बल दीड तास चाललेल्या या नाट्यावर अखेर पडदा पडला.
ज्ञानेश्वर साळवे रा.मसलाखुर्द, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद या तरुण शेतकऱ्याने आज विस्तारीत इमारती मधिल सातव्या माळ्यावरील सज्ज्यावर जावून आत्महत्येचा प्रयत्न केला. सोयाबीन आणि कापसाला भाव नसल्याने नुकसान सोसाव्या लागलेल्या या तरूण शेतक-यांला मंत्र्यांची भेट घ्यायची होती मात्र मंत्रालयात कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर अथवा राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित नसल्याने वैकल्यग्रस्त झालेल्या या तरूणाने माहिती व तंत्रज्ञान विभागातून थेट सज्जा गाठून आपली व्यथा मांडू लागला. हि माहिती समजताच पोलीसांच्या एकच तारांबळ उडाली. याच वेळी या तरूणाची समजूत काढण्याचा अनेक अधिका-यांनी आणि पालीसांनी प्रयत्न केला. त्याने त्याचा मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी खाली टाकल्यानंतर पोलीसांनी त्याच्याशी संपर्क साधला मात्र तो तरूण आपल्या निर्णयावर ठाम राहिला. मला एखाद्या जबाबदार व्यक्तीशी बोलणे करून द्या अशी मागणी केल्यानंतर पोलीसांनी मंत्रालयातील पत्रकार प्रमोद डोईफोडे यांच्याशी त्याचे बोलणे करून दिले. मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांशी माझे बोलणे करून द्या व मला मदत करा अशी विनंती या तरूणाने डोईफोडे यांच्याशी झालेल्या संभाषणात केली. याच वेळी या तरूणाने मोठ्या काचेचा तुकडा घेवून आत्महत्येची धमकी दिल्याने एकच तारांबळ उडाली.
पोलिसांसह मंत्रालयातीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही याठिकाणी गर्दी केली. त्यानंतर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाने आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला खाली उतरवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. यावेळी खालील बाजूस जमिनीवर जंपिंग सीटही लावण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा कृषीमंत्री पाडुरंग फुंडकर यांच्याशीच बोलणार असल्याचे सांगून त्याने इतर कोणाशीही बोलण्यास नकार दिला. यात सुमारे तासभर गेला. पाचच्या सुमाराला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे याठिकाणी आले. तावडे यांनी या तरुण शेतकऱ्याशी चर्चा करुन त्याला समजावण्याचे प्रयत्न केला. सुमारे वीस मिनिटांच्या वाटाघाटीनंतर या तरुणाला सज्ज्यावरुन सुखरुप उतरवण्यात यश आले. त्यासोबतच उपस्थित सर्वांचा जीव भांड्यात पडला कपाशी आणि सोयाबीनचे कोसळलेले दर आदी गोष्टींमुळे निराश होऊन या तरुणाने हे पाऊल उचलल्याचे समजते. मात्र, त्याच्या वैयक्तिक स्वरुपाच्या कोणत्याही मागण्या नव्हत्या असे समजते. राज्य सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात ही त्याची प्रमुख मागणी असल्याचे सांगण्यात आले.
शिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले की या तरुणाचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता , त्याने कृष्णा खोऱ्यातील शेतक-यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मांडला , शेतीला हमीभाव मिळत नसल्याची तक्रार केली तर स्वामीनाथन शिफारशींच्या अंमलबजावणीची मागणी केली , त्याची स्वताची तीन एकर शेती असून त्यात त्याला म्हणावे तसे उत्पन्न मिळाले नाही अशी ही त्याची तक्रार होती , त्याच्या सर्व मागण्या रास्त होत्या मात्र तरुणाने आपल्या जीवावर बेतेल असे आंदोलन करू नये असे विनोद तावडे यांनी सांगितले . त्याच्या मागण्या आणि घडलेला प्रकार मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना सांगणार असल्याचे ही तावडे यांनी पत्रकारांना सांगितले . माझ्यावर कोणताही गुन्हा नोंदवू नये आणि मला माझ्या आईच्या किंवा नातेवाईकांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी या तरूण शेतक-यांने केल्याने त्यावर कोणताही गुन्हा नोंद केला नसून रात्री उशीराने या तरूणाला पोलीसांनी ताब्यात घेतले.