तर पक्षाला ज्ञानेश्वरचा साळवेचा अभिमान आहे
नवाब मलिक
मुंबई दि. ११ उस्मानाबाद मधील ज्ञानेश्वर साळवे या तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशावरुन कृती केलेली नाही मात्र राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतक्या तळमळीने आंदोलन करत असेल तर पक्षाला त्याचा अभिमान आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपच्यावतीने करण्यात आलेल्या आरोपाला दिली आहे.
काल मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर चढत उस्मानाबाद मधील एका शेतकरी तरुणाने शेतीसंदर्भात व्यथा मांडण्यासाठी कृषीमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्याला भेट मिळू शकली नसल्याने त्याने मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर चढून आंदोलन केले. त्याच्या या कृतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बोट दाखवण्यात आले. तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला आंदोलन करायला सांगितले असा आरोप करण्यात आला होता. त्यावर पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.