वर्षा निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्ताराच्या खलबतांना सुरूवात !
मुंबई दि.१३ हिवाळी अधिवेशनापूर्वी करण्यात येणा-यामंत्रिमंडळ विस्ताराची खलबत मुख्यमंत्र्यांच्या “वर्षा” निवासस्थानी सुरु झाली आहेत. ‘वर्षा’ निवासस्थानी भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला काही वेळापूर्वी सुरुवात झाली आहे.
राज्यातील भाजपाचे दिग्गज नेते या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी मंत्री एकनाथ खडसे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. कर्जमाफीची योजना शेतक-यापर्यंत पोहचली किंवा नाही याचा आढावा घेण्याबरोबरच, राज्य सरकारची तीन वर्षातील कामे जनतेपर्यंत पोचविण्याबाबत या बैठकीत चर्चा सुरू असून, आगामी मंत्रिमंडळ विस्तार, हिवाळी अधिवेशन, जनतेत वाढत असलेल्या विरोधी वातावरणाचे आव्हान यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.
हिवाळी आधिवेशनापुर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळात नव्या चेहर्यांना संधी देताना काही मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे. काही मंत्र्यांच्या खात्यामध्ये फेरबदल केले जाणार आहेत. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे संकेत दिले होते.
नारायण राणे यांच्यासह जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांचाही मंत्रिमंडळ प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कोकणात भाजपा कमकुवत आहे. राणेंना प्रवेश देऊन कोकणात पक्ष बळकट करण्याची भाजपची रणनीती आहे.गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर बिल्डरला लाभ देणे आणि मुख्यमंत्र्यांचा खोटा शेरा मारल्याचा आरोप झाल्याने त्यांची लोकायुक्तांमार्फत चौकशी सुरु झाली आहे. त्यांना मंत्रीपदावरुन हटविण्याबाबत मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे. त्यांचे मंत्रीपद राहीलेच तर त्यांचे खाते बदलले जावू शकते. फेरबदलासाठी शिवसेनेतही हालचाली सुरु आहेत. सुभाष देसाई यांना मंत्रीमंडळातून डच्चू मिळणार अशी शक्यता आहे.