सरकारच्याविरोधात राष्ट्रवादीचे “हल्लाबोल” आंदोलन
२५ नोव्हेंबरपासून सुरुवात
मुंबई दि. १४ शेतकऱ्यांची प्रत्यक्षातील कर्जमाफी आणि दयावयाची कर्जमाफी यामध्ये असलेली तफावत, राज्यातील युवकांना दरवर्षी दाखविण्यात येणारी रोजगाराची आमिषे, महिलांना वाटणारी असुरक्षितता, राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था व इतर मुलभुत प्रश्नांवर भाजपाचे सरकार अपयशी ठरले असून सरकारच्याविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी परिषदेमध्ये दिली.
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या २५ नोव्हेंबर या स्मृतीदिनापासून हे हल्लाबोल आंदोलन सुरु केले जाणार आहे. हे आंदोलन राज्यातील प्रत्येक जिल्हयात संबंधित नेते आणि पक्षाचे वरिष्ठ नेते आंदोलन करणार आहेत.या आंदोलनाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यातील सर्वात जास्त आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्हयातून १ डिसेंबर रोजी पदयात्रा काढण्यात येणार असून ही दिंडी पदयात्रा दिनांक ११ डिसेंबर रोजी विधानभवन नागपूर येथे धडकणार आहे. ही पदयात्रा यवतमाळ जिल्हयातून सुरु होवून पनवा-वर्धा मार्गे नागपूरला पोचणार आहे. या पदयात्रेमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ नेते अजित पवार, विधीमंडळ गटनेते आमदार जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार दिलीप वळसेपाटील यांच्यासह प्रमुख नेते, कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.