२५ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफी देवूच शकणार नाही

२५ नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफी देवूच शकणार नाही

अजित पवार यांचा दावा

मुंबई दि. १४ राज्यातील शेतकऱ्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत हे सरकार कर्जमाफी देवूच शकणार नाही असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांना तुच्छ लेखणाऱ्या या सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे असा आरोप करत,या सरकारच्या विरोधात आम्ही हल्लाबोल आंदोलन करत असल्याचे स्पष्ट केले.

अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर सडकून टिका केली. त्यांनी या सरकारला कशाची मस्ती आली आहे, सरकारचे मंत्री कसे काय धाडस करतात. माध्यमांना मॅनेज करण्याची भाषा हे मंत्री करत आहेत. पुरोगामी महाराष्ट्राने अशी भाषा ऐकली नव्हती आज अशी भाषा ऐकण्याची वेळ पुरोगामी महाराष्ट्रावर आली आहे असेही पवार म्हणाले.

फसलेली कर्जमाफी, वाढलेले भारनियमन, बेरोजगारी, आधारभूत किंमत मिळत नाही आहे. राज्यातील जनतेला जीवन जगणं त्रस्त झालंय. प्रत्येक बाबतीमध्ये हे सरकार अपयशी ठरले असून हे माझं सरकार नाही म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. जाहिरातीवर सरकार चालत नाही हे कधी कळणार या सरकारला असा सवालही पवार यांनी केला.

सांगलीमधील अनिकेत कोथळे याच्याबाबतीत घडलेली घटना सरकारला लाजिरवाणी आहे. सिंधूदुर्गच्या आंबोलीमध्ये सापडलेला मृतदेह हा अनिकेतचा नाही अशी चर्चा असून त्या मृतदेहाची डिएनए टेस्ट झाली पाहिजे अशी मागणीही अजित पवार यांनी केली. अनिकेत कोथळेप्रकरणामध्ये सरकारचे अपयश आहे. अनिकेतप्रकरणी जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडू लागला आहे हे लोकशाहीला घातक असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.सरकारची कर्जमाफी योजना नसून कर्जवसुलीची योजना आहे. ही शेतकरी सन्मान योजना नसून शेतकरी अपमानित योजना आहे.  महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा अपमान या सरकारने केला आहे.  या अपमानाचा बदला शेतकरी घेतल्याशिवाय राहणार नाही असेही अजित पवार म्हणाले.

 

Previous articleसरकारच्याविरोधात राष्ट्रवादीचे “हल्लाबोल” आंदोलन
Next articleराज्यातील गुंतवणुकीबाबत श्वेतपत्रिका काढा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here