राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना यापुढे “नो एन्ट्री”
मुंबई दि.१४ पुढील दोन वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवणार नाही, असे आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जाहीर केले.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा सर्व पक्षीय सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी झालेल्या सत्कार कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह दिलीप वळसे पाटील यांच्या सत्कार सोहळ्याला मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात आले होते.यापूर्वी पक्षाच्या काही नेत्यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना बोलवले होते. त्याबाबत विचारणा व्हायची. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे, असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
आमचे मुख्यमंत्र्यांसोबत भांडण नाही, कार्यक्रमात एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी जाणे ही आपली संस्कृती आहे, मात्र त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना यापुढच्या कार्यक्रमांना बोलावणार नाही, असेही पवार यांनी नमूद केले.