शेतक-यांचे आंदोलन हाताळण्यात प्रशासनाला अपयश आल्यामुळेच हिंसक वळण
राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप
मुंबई, दि.१५ अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे शेतकऱ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याची घटना अतिशय दुर्दैवी असून, या घटनेचा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. प्रशासनाला आंदोलन हाताळण्यात आलेल्या अपयशामुळेच आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचा थेट आरोप करुन या घटनेची चौकशी करून दोषीवर तातडीने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शेवगाव येथील घटनेबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, राज्यातील शेतक-यांच्या कोणत्याही प्रश्नांवर शासन गंभीर नाही.कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हे अधिक स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचा सरकारच्या विरोधातील उद्रेक आता रस्त्यावर आला आहे. हे सरकारचे अपयश असल्याचे विखे पाटील म्हणाले.