तर सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही

तर सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही

उध्दव ठाकरे यांचा इशारा

रत्नागिरी दि.१५ राज्य सरकार मध्ये शिवसेना सहभागी आहे.परंतु जनतेच्या मुळावर येणारे निर्णय सरकार घेणार असेल तर या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज येथे दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरीत झालेल्या पक्ष मेळाव्यात सरकारला इशारा दिला. माळनाका येथे दोन कोटी खर्चातून उभारलेल्या स्कायवॉकचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर येथील सावरकर नाट्यगृहात शिवसेना पदाधिका-यांचा मेळावा झाला. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, सेना जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी,आदी उपस्थित होते.

शेतक-यांना कर्जमाफी देण्यासाठी शिवसेनेने सरकारले भाग पाडले. मात्र, त्यानंतरही कर्जमाफीचे पैसे शेतक-यांपर्यंत पोहोचले नाही, हे दुर्दैवी आहे. शिवशाही कर्जमाफी योजना असे नाव देऊन शिवरायांची बदनामी करणार असाल तर ते खपवून घेणार नाही. आम्हाला शिवशाही हवी आहे. चुकीचे वागून लोकांना वेठीस धरणा-यांना धडा शिकवण्याची जी शपथ शिवसैनिकांनी घेतली ती शिवशाही आहे असे ठाकरे यावेळी म्हणाले.

ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातचा समाचार घेतला.” हे मन की बात करतात. तुमची मन की बात काय चाटायची आहे” जनतेच्या मनासारखे निर्णय घेणार नसाल तर मन की बातचा काय उपयोग आहे. जनतेला जे अपेक्षित आहे तेच आम्ही करणार, असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

Previous articleऊस दर नियंत्रण संदर्भात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी
Next articleकेंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंना मातृशोक