बी.टी.कापसावरील बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल हेक्टरी २५ हजार रुपये भरपाई द्या
धनंजय मुंडे यांची मागणी
मुंबई दि. २१ बी टी कापसावरील बोंड अळीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून, या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
या संदर्भात मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेवुन निवेदन दिले. राज्यात कापसाचा पेरा झालेल्या ४० लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाला बोंडअळीचा फटका बसला आहे. त्यामुळे मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीटी कॉटन बियाणास बोंडअळी प्रतिसाद देत नसल्याबाबत नागपूरच्या केंद्रीय कापुस संशोधन संस्थेने डिसेंबर २०१५ मध्ये शासनास अहवाल दिला होता. या अहवालाची दखल घेऊन उपाययोजना करण्याची मी जुलै २०१७ मध्ये शासनाला पत्र देऊन मागणी केली होती. मात्र शासनाने या अहवालाकडे आपल्या पत्राकडे दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या फवारण्यामुळे २० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यु झाला आहे. बोंडअळीचे हे संकट मागील दोन वर्षांपासून कायम आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी मुंडे यांनी या पत्रात केली आहे. मागील दोन वर्षात बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबतही कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.