३ ते ५ हजार भरून शेतक-यांना मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याची सवलत
मुंबई, दि. २३ राज्यातील शेतकऱ्यांसाठी केवळ ३ व ५ हजार रुपये भरून मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याची सवलत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे जाहीर केली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी असलेल्या या योजनेचा लाभ येत्ये ३० नोव्हेंबर पर्यंत लाभ घ्यावा, असे आवाहनही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केले आहे.
या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांची ३० हजारापेक्षा कमी थकबाकी असल्यास सुरुवातीला केवळ ३ हजार व ३० हजारापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना ५ हजार रुपये भरून ३० नोव्हेंबर पर्यंत मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेता येईल. तसेच ज्या शेतकऱ्यांना वीज देयकाची दुरुस्ती करावयाची आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक फिडरनिहाय वीज देयक दुरुस्ती शिबीराचे आयोजन १ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत महावितरणतर्फे करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
कृषीपंपांना थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ ची घोषणा ३० ऑक्टोबर ला करण्यात आली होती. या योजनेची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत असून या योजनेत सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन ऊर्जामंत्र्यांनी केले आहे.तसेच ज्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे खंडित करण्यात आलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी पैसे भरताच त्यांचा वीजपुरवठा तात्काळ जोडावा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.