… तर सत्तेला लाथ मारेन आणि जनतेसोबत येईन
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
कोल्हापूर दि.२४ शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. गरज पडली तर सत्तेला लाथ मारेन आणि जनतेसोबत येईन, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. शिनोळीत शिवपुतळ्याचे अनावरण केल्यानंतर शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. उध्दव ठाकरे हे तीन दिवसाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर आहेत.
मेळाव्यातील शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरुन खाली उतरुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या समस्या, सीमाप्रश्न यावर भाष्य केले. कीटकनाशक फवारणारा शेतकरीच कीटकनाशकांचा बळी जातो आहे. कर्जमुक्ती फक्त कागदावरच आहे अशी टीका करतानाच गरज पडली तर सत्तेला लाथ मारुन तुमच्यासोबत येईन.” असे आश्वासन उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले.
सीमाभाग म्हणजे मराठी भूभाग आहे. देशाच्या सीमांना सीमा म्हणतात. म्हणून मी सीमाभाग म्हणजे कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र असे म्हणतो. कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र मी माझ्या महाराष्ट्रात आणेन, असे वचन देतो, असेही ठाकरे म्हणाले.“शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस बंद दरवाजा आड चर्चा करतात आणि चर्चा कशाबद्दल झाली, विचारल्यावर क्रिकेटची चर्चा म्हणून सांगतात. मेलं ते क्रिकेट. शेतकऱ्याचं काय होणार याचा विचार करा.” असा टोला ठाकरे यांनी लगावला.