शिवसेनेसह दोन्ही काॅग्रेसची मते खेचून जिंकलो असतो
नारायण राणेंचा दावा
मुंबई दि.२७ मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतरच विधानपरिषदेची पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घेतला. मात्र हि निवडणूक लढवली असती तर शिवसेनेची पंचवीस आणि काॅग्रेस व राष्ट्रवादीची मते खेचून किमान पंधरा अधिकची मते घेऊन हि पोटनिवडणूक नक्कीच जिंकली असती असा दावा नारायण राणे यांनी आज केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य वरिष्ठ भाजपा नेत्याशी काल रात्री चर्चा झाली त्यानुसार विधानपरिषदेच्या एका जागेसाठी होणारी पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी सांगितले. राणे यांनी काॅग्रेसला सोडचिठ्ठी देताना विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त जागेसाठी येत्या ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे. हि पोटनिवडणूक राणे भाजपच्या पाठिंब्याने लढण्यासाठी उत्सुक होते. मात्र राणेंना विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या सहकार्याने काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसने तयारी केली होती. गुजरात निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने पाठिंबा काढला तर फडणवीस सरकार अडचणीत आले असते व ते भाजपाच्या दिल्लीतील नेत्यांना अडचणीचे वाटले. त्यामुळे राणेंना थांबण्याचा सल्ला देण्यात आल्याची चर्चा आहे.
शिवसेनेची पंचवीस मते फोडून तसेच काॅग्रेस व राष्ट्रवादीचीही काही मते खेचून किमान पंधरा अधिकची मते घेऊन पोटनिवडणूक नक्कीच जिंकली असती असा दावा राणेंनी केला. या पोटनिवडणुकीत उमेदवाराला विजयासाठी किमान १४५ मतांची आवश्यकता आहे. भाजपाकडे स्वत:ची १२२ मते आहेत. ही निवडणूक लढवण्याची आपली इच्छा होती असे स्पष्ट करून राणे म्हणाले की, मात्र भाजपाला अडचणीत आणण्याची माझी इच्छा नव्हती व नाही म्हणून मी न लढण्याचा निर्णय घेतला. मात्र राणेंना विरोध म्हणून शिवसेना व दोन्ही काॅंग्रेस असे तीन पक्ष एकत्र येण्यासाठी सिद्ध होतात हा नारायण राणेचा विजय आहे असे ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंवर टीका करताना राणे म्हणाले की, सत्तेला लाथ मारतो म्हणत हे तीन वर्षे सत्तेत आहेत. कर्जमाफीवर हे टीका करतात पण यांच्याकडे कर्जमाफी पूर्ण देण्यासाठी काय प्रस्ताव आहे तो त्यांच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत का मांडला नाही असा सवाल राणे यांनो केला