एसटी भरतीअंतर्गत ३ जिल्ह्यांचा निकाल लवकरच
मुंबई, दि. २८ राज्य परिवहन महामंडळाच्या चालक तथा वाहक (कनिष्ठ) पदाच्या सरळसेवा भरतीअंतर्गत कोकण विभागासाठी एकूण ७ हजार ९२९ पदांसाठी जाहीरात देण्यात आली होती. त्यापैकी मुंबई, सिंधुदूर्ग व रायगड विभागातून ९०० उमेदवारांची निवड करण्यात आली असून पालघर, ठाणे व रत्नागिरी विभागाचा निकाल तयार करण्याचे काम सुरु आहे. हा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
कोकण विभागात भरतीनंतरही रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नवीन वर्षात भरतीसाठी जाहीरात देण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचाराधीन नाही, अशी माहिती दिली आहे.यासंदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये उलट-सुलट बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याबाबत एसटी महामंडळाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी खुलासा प्रसिद्ध केला आहे.
मुंबई विभाग एक हजार २९ पदांकरीता जाहीरात देण्यात आली होती, त्यासाठी १८८ उमेदवार पात्र झाले आहेत. सिंधुदूर्ग विभाग ७६९ पदांकरीता जाहीरात देण्यात आली होती, त्यासाठी ३२५ उमेदवार पात्र झाले आहेत. रायगड विभाग एक हजार ११७ पदांकरीता जाहीरात देण्यात आली होती, त्यासाठी ३८७ उमेदवार पात्र झाले आहेत. अशा प्रकारे या ३ विभागातून एकुण ९०० उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
तसेच, पालघर विभागाची लेखी परीक्षेचे व वाहन चालन चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांनुसार निकाल तयार करण्याचे काम सुरु असून लवकरच पालघर विभागाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, रत्नागिरी विभागाची वाहन चालन चाचणीचे कामकाज सुरु असून, त्यानंतर ठाणे विभागाची वाहन चालन चाचणी घेण्यात येणार आहे, या दोन्ही विभागातील वाहन चालन चाचणीचे कामकाज पूर्ण होताच मिळालेल्या गुणांनुसार निकाल जाहीर करण्याची कार्यवाही करण्यात येईल.