सरकार राज्य चालविण्यास अपयशी ठरल्याचे द्योतक
अधिवेशनाचा कालावधी कमी केल्याने अशोक चव्हाण यांची टीका
अमरावती दि.३० नागपूरमध्ये होणा-या हिवाळी अधिवेशनात विदर्भाचे प्रश्न, समस्या सुटावेत असे अपेक्षित आहे. मात्र, अधिवेशन केवळ १० दिवस चालेल, असे सरकारने जाहीर केल्याने, सरकार राज्य चालविण्यास अपयशी ठरल्याचेच हे द्योतक आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केलीे आहे.
अमरावती येथे पार पडलेल्या विभागीय काँग्रेस पदाधिका-यांच्या बैठकीला खा. चव्हाण येथे आले होते.त्यावेळी ते बोलत होते. चव्हाण यांनी सरकारवर टीकास्त्र सोडत, शासनाच्या धोरणांमुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक, सामान्य माणूस हतबल झाला आहे. कर्जमाफीसाठी आॅनलाइन अर्ज, दर दिवसाला नवीन जीआर, सोयाबीन व कापूस खरेदीत गोंधळ, भारनियमन, आयटीत घोळ आणि संबंधित सचिवांची बदली, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असे एक ना अनेक समस्या, प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्य शासनाने गेल्या तीन वर्षांत काय केले, याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेसच्याशतीने अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मोर्चाचे गुलाम नबी आझाद त्याचे नेतृत्व करणार आहेत.
संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विरोधक गोंधळ घालतात म्हणून हिवाळी अधिवेशन १० दिवस चालेल, असे जाहीर केले. अधिवेशनात प्रश्न मांडणे म्हणजे गोंधळ घालणे नव्हे. भाजप विरोधात असताना त्यांनी नेमके काय केले, असा सवाल खा. चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला. भाजपला सरकार चालविता येत नाही. तीन वर्षांतच बट्ट्याबोळ झाला. शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. याबाबत अधिवेशनात ठोस आश्वासन देणे हे सरकारचे काम आहे. मात्र, अधिवेशन किमान तीन आठवडे न चालविता अल्पावधीत चालविणे ही सरकारची पळपुटी भूमिका असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.