…तर फडणवीस यांनाही लोक चोरांचे मुख्यमंत्री म्हणतील
धनंजय मुंडे
कळंब : राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा धसका मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद पाहता मुख्यमंत्र्यांच्या पोटात दुखू लागले आहे. आम्ही मंत्र्यांचे घोटाळे पुराव्यासह विधिमंडळात उघड केले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी त्यावर काहीही केलेले नाही. हे असेच चालू राहीले तर एक दिवस लोक मुख्यमंत्र्यांनाही चोरांचे मुख्यमंत्री म्हणून ओळखतील, अशी घणाघाती टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज केली.
हल्लाबोल पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी मडकोणा ते कळंब असा १३ किमीचा पायी प्रवास झाल्यानंतर कळंब येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणतात की, ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री भ्रष्ट मंत्र्यांना सावरत आहेत. त्यावरून तरी राज्याचे मुख्यमंत्री ‘तुम खाते रहो, मै संभालते रहुंगा’, असे ब्रिदवाक्य घेऊन चाललेत काय? असे वाटायला लागले आहे.राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उर्जामंत्री विदर्भाचे आहेत तरी विदर्भातील शेतकरी मरत आहेत. म्हणूनच या नाकर्त्या सरकार विरोधात आम्ही ही हल्लाबोल पदयात्रा काढली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेचपंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या वेळी विदर्भात दिलेली भाषणे जनता कधी विसरणार नाही, अशी आठवणही त्यांनी करुन दिली.
कर्जमाफीच्या घोळाबद्दल सांगताना मुंडे म्हणाले की, कळंब तालुक्यात फक्त नऊ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मॅसेज आला आहे. ज्यांना मॅसेज आलाय त्यांनी त्यावर विश्वास ठेवावा की नाही, अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. पोकळ घोषणांचा भडीमार करुन निव्वळ दिशाभूल करणारे असे हे शिवसेना-भाजपचे सरकार असल्याची टीका मुंडे यांनी केली.