विदर्भातील शेतकऱ्यांवर बोंड अळीचे महाभयानक संकट
– सरकारने तातडीने दिलासा द्यावा – धनंजय मुंडे
वर्धा : संपुर्ण महाराष्ट्रातील कपाशीच्या शेतावर बोंड अळीचे भीषण संकट उभे राहिले आहे. विदर्भातील कापूस शेतकऱ्यांवर तर महाभयानक संकट कोसळले आहे. सरकारने या पिडित शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणारे निर्णय घ्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मु्ंडे यांनी केली आहे. ही नैसर्गिक आपत्ती असली तरी शेतकऱ्यांचे संकट मात्र सरकारनिर्मित आहे. वेळीच दखल घेतली असती तर शेतकऱ्यांचे संकट टळले असते.
बोंड अळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजाराची मदत तसेच जो कापूस विक्रिलायक निघाला आहे त्याला हमीभाव तसेच ५०० रुपये बोनस द्यावा, अशी मागणी मुंडे यांनी केली.
हल्लाबोल आंदोलनाचा आज तिसरा दिवस होता. यवतमाळ जिल्हा्यातील कळंब तालुक्यातून सुरु झालेली पदयात्रा कामठपाडा, माणकापूर, गलमगाव होत शिरपूर येथून वर्धा जिल्ह्यात पोहोचली. या दरम्यान मुंडे यांनी ठिकठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधला. सोयाबिन, कापसाच्या शेतांना भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांनी अतिशय संतप्त भावना व्यक्त केल्या. बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीचे वर्णन करताना शेतकऱ्यांना अश्रू आवरत नव्हते. माणकापूर येथे एका तरूण शेतकऱ्याने कापसाला भाव नाही म्हणून तो जाळून टाकला.
बोंड अळीच्या संकटाबाबत सहा महिन्यापूर्वीच पत्र लिहून सरकारला तातडीने पावले उचलण्याची विनंती केली असल्याचे मुंडे यांनी सांगितले. मात्र शासनाने कोणतीही खबरदारी घेतली नाही. सहा महिन्यानंतर शासनाने पत्राचे उत्तर दिले असून त्यात केंद्र शासनाला याची माहिती दिली असून उपाययोजना करणार आहोत, असे उत्तर दिले आहे. आणखी किती शेतकरी मरण्याची हे सरकार वाट पाहत आहे असा संतप्त सवाल यावेळी मुंडे यांनी केला आहे.
माणकापूर येथे काही शेतकऱ्यांनी बोंड अळीने खराब झालेले बोंड मुंडे यांच्याकडे सुपुर्त केले. हे सरकार पर्यंत पोहोचवा आणि आमची अवस्था सांगा, अशी कळकळीची विनंती या शेतकऱ्यांनी केली. गेले तीन दिवस पदयात्रा यवतमाळ जिल्ह्यात आहे. मात्र कुठेही कृषी अधिकारी किंवा महसूल विभागाचे कर्मचारी पंचनामा करताना दिसले नाहीत. इतके मोठे संकट आले असतानाही सरकार झोपले आहे की काय? असा सवाल मुंडे यांनी उपस्थित केला.