डाॅ.आंबेडकर स्मारक भाजप सरकारने जाणीवपूर्वक रखडवले
आमदार प्रकाश गजभिये यांचा आरोप
वर्धा : इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी लागणाऱ्या खर्चाचा आराखडा तीन वर्ष झाली तरी तयार नसून कामाची सुरुवात करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भाजप सरकार जाणीवपूर्वक रखडवत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अगोदर तरी सरकारने स्मारकाच्या कामाला सुरुवात करायला हवी होती परंतु भाजप-सेनेचे सरकार आंबेडकरी जनतेची दिशाभूल करीत राजकीय पोळी भाजून घेत आहे अशी टिकाही आमदार प्रकाश गजभिये यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठया थाटामाटात करोडो रुपये खर्च करुन भूमीपूजन करण्यात आले. १४ एप्रिलपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाला सुरुवात होणार अशी घोषणा करुन तीन वर्ष उलटली.परंतु स्मारकाची एकही वीटही लावलेली नाही. ही आंबेडकरी जनतेची फसवणूक असून भाजपाने आंबेडकरी जनतेचा विश्वासघात केला आहे.
याअगोदर प्रत्येक अर्थसंकल्पीय,पावसाळी,हिवाळी अधिवेशनामध्ये भाजप-सेनेच्या सरकारने विधानपरिषदेच्या सभागृहामध्ये समारकाच्या प्रश्नावर घुमजाव करणारी उत्तरे दिली आहेत. इंदू मिलची संपूर्ण जागा ४.८४ हेक्टर असून त्यापैकी २.०१ हेक्टर जागा अजुनही सीआरझेडच्या नियमानुसार बाधीत असून राज्यशासनाकडे हस्तांतरीत झालेली नाही.अजुनही इंदू मिलच्या जागेच्या टीडीआरची मुंबई महानगरपालिकेने मान्यता दिलेली नसून ,वस्त्रोद्योग महामंडळाच्या साडेबारा एकर जमिनीची किंमत १ हजार ४३३ कोटी रूपयांचा घोळ अजुनही संपलेला नाही.त्यामुळेच इंदूमिलच्या जमिनीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुन्हा रखडण्याची भीती आमदार गजभिये यांनी व्यक्त केली.