४१ लाख शेतकऱ्यांसाठी १९ हजार ५३७ कोटी रूपये मंजूर
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांसाठी १९ हजार ५३७ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत राज्य सरकारने आज १६ लाख ९८ हजार ११० शेतकऱ्यांच्या खात्यांसाठी ५ हजार ५८० कोटी रूपये मंजूर केले. याशिवाय, वन टाईम सेटलमेंट योजनेंतर्गत ६ लाख ५ हजार ५०५ शेतकऱ्यांच्या खात्यांसाठी ४ हजार ६७३ कोटी रूपये मंजूर केले आहेत. त्यामुळे आजपर्यंत एकूण सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यासाठी १४ हजार ८६४ कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून, वन टाईम सेटलमेंटच्या ४ हजार ६७३ कोटी रूपयांसह एकूण १९ हजार ५३७ कोटी रूपये मंजूर केले आहेत.
शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविल्यानंतर एकूण ७७ लाख खातेधारक असून, पुन्हा आलेले अर्ज तसेच इतर त्रुटी दूर करून सुमारे ६९ लाख अर्जांवर प्रक्रिया करण्यात आली आहे.शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत ही प्रक्रिया अशीच सुरू राहणार आहे, अशी माहिती राज्य शासनाच्या वतीने देण्यात आली आहे.